Friday, May 13, 2011

उन्हाळ्याची सुट्टी !



शनिवारचा दिवस. सुट्टीचा. आदल्या दिवशी ऑनलाइन सिनेमा बघत झोपायला खूप उशीर झाल्यामुळे साहजिकच उशिरा उठले होते. डोकं जड झालं होत. जवळ जवळ जेवणाची वेळ होत आली असली तरी 'ब्रेकफास्ट सीरियल्स' आणि दुधाचा बाउल घेऊन स्वयंपाक घराच्या खिडकी पाशी उभी होते. खरं तर सकाळी तिथून छान कोवळं ऊन आत येतं... पण आता सूर्य चांगला डोक्यावर आलेला होता. हवेत थोडी धग जाणवत होती. सिंगापूर असून चक्क ३-४ दिवस पाऊस पडला नव्हता. आत जाऊन बेडरूम मध्ये AC च्या गारव्यातच बसावं असा विचार करत होते तेवढ्यात खालून खूप आरडा-ओरडा ऐकू आला. पाहिलं तर ७-८ लहान मुलांचा दंगा चालू होता. मग लक्षात आलं, की अरे एप्रिल महिना सुरू झालाय.... या मुलांच्या परीक्षा संपून मस्त सुट्टी चालू झाली असेल. एप्रिल-मे म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीचाच सीझन! उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरी वगैरे कोणत्याही कारणानी घर, घरची माणसे, देश सोडून एवढ्या लांब आल्यावर हा काळ आपोआप सुट्टीचा न राहता फक्त उन्हाळ्याचा किंवा स्प्रिंग चा होऊन गेला होता आणि कामाच्या व्यापात, नव्या जीवन-पद्धतीशी जुळवून घेताना, रोजच नव्या परीक्षांना सामोरे जात काळाच्या बरोबर चालायच्या प्रयत्नात, मी 'आपण कधी तरी लहान होतो आणि आपल्याला दर वर्षी २ महिने पूर्ण-निव्वळ-बिना भेसळ सुट्टी असायची' हे विसरुनच गेले होते. घशातला खोलवरचा आवन्ढा गिळून आत जाऊन बसले पण उन्हाळ्याच्या सुट्टीची आठवण स्वस्थ बसू देई ना... एक एक गोष्ट डोळ्यासमोर यायला लागली.......उन्हाळ्याची सुट्टी... माझी लहानपणची, पुण्यातली उन्हाळ्याची सुट्टी कशी असायची?

वार्षिक परीक्षेच्या शेवटच्या पेपरची एवढी आश्चर्यकारक ओढ लागलेली असायची आणि कधी एकदा ती शेवटची उत्तर-पत्रिका देऊन टाकतोय असं झालेलं असायचं. कारण शेवटच्या पेपरचा दिवस हा परीक्षेत गणला जायचाच नाही. पुढच्या दोन महिन्याच्या पोटभर सुट्टीचा पहिला घास असायचा तो दिवस! अगदी लहानपणी जेंव्हा रिक्षावाले काका शाळेत सोडायचे-आणायचे तेंव्हा शेवटच्या दिवशी ते सरळ घरी आणून न सोडता आधी गुह्राळात घेऊन जायचे. उसाचा रस, त्यात हवा तेवढा बर्फ, (घे, घे.. मी नाही सांगणार तुझ्या आईला!),मग कधी कधी वडापाव आणि शेवटी पाण्याची रंगपंचमी(?) खेळून, चिकार दंगा करून आणि रिक्षात तश्याच ओल्या कपड्यांनी आणि चपला-बुटांनी भरपूर राडा करून मग आमचं ध्यान घरी पोचायचं आणि घरात पाउल टाकल्या टाकल्या आकाशवाणी च्या आविर्भावात एक घोषणा केली जायची "हुर्रे... माझी उन्हाळ्याची सुट्टी सुरू झालेली आहे. आता मी खूप मज्जा करणार आहे आणि हवं तसं वागणार आहे...!" याला खर तर फार काही अर्थ नसायचा कारण हवं तसं वागता येणं म्हणजे काय हे तेंव्हा नाही कळायचं घरात राहून :)

परीक्षा चालू असतानाच सुट्टीच सगळं प्लानिंग झालेलं असायचं... त्यात दिवसाची सुरुवात कधीही झाली तरी त्यातला सकाळचा बराचसा वेळ हा कॅर्रोम, पत्ते वगेरे खेळण्यात घालवलाच पाहिजे असा एक नियम असायचा. अधून मधून कुतूहल आणि नाविन्य म्हणून सागरगोटे, सारीपाट असे आज्जीनी सुचवलेले खेळ व्हायचे पण त्यांचा जास्त टिकाव लागायचा नाही. लहान भावांना कटवून गुपचूप आम्ही 'मोठ्या' मुली एखादी च्या घरी 'घर-घर' सुद्धा खेळायचो. त्यात चुरमुऱ्याच्या पोळ्या आणि दाणे-गूळ यांचा लाडू करताना भारी वाटायचं.. पण त्यांनी पोट भरलं नाही की आपोआप घराकडे पाय वळायचे... दुपारच्या जेवणाची वेळ झालेलीच असायची तोपर्यंत. उन्हाळ्यातल्या जेवणाला मात्र काय साज असायचा! नेहेमीचीच भाजी-पोळी, पण त्या शेजारी आमरसाची वाटी आली की साध्या साडीचं जरतारी काठ-पदर लावल्यावर पैठणीत रुपांतर व्हावं तसं काहीसं व्हायचं. लहानपणी कधी हापूस साठीच असा हट्ट केल्याचा आठवत नाही. पायरी, केशर, गोटी ... कोणताही आंबा असला तरी त्याचा तोंडात मावणार नाही एवढा घास म्हणजे 'अहाहा' ! तूप किंवा दूध आणि मिरपूड वगैरे घालून साग्रसंगीत आमरस आताही कधी खाल्ला की त्याच्या चवीबरोबर उन्हाळ्याची सुट्टी जिभेवर रेंगाळायला लागते. 

दुपारच्या जेवणा नंतर 'खूप ऊन आहे, आत्ता अजिबात घरा बाहेर पडायचं नाही .. नाही तर ....' अश्या धमकीचा मान राखून घरातल्या घरात नवनवीन उद्योग सुरु व्हायचे. कुंडीतल बागकाम, वाचन, चित्रकला, सरबतानी भरलेला पेला फ्रिझमध्ये ठेवून त्याचं आईस-क्रीम होतं का याचे प्रात्यक्षिक प्रयोग, भरतकाम करून उशीचा अभ्रा विणता यावा या प्रयत्नात हातरुमालापर्यंतच टिकलेला उत्साह अश्या या ना त्या गोष्टींची दर वर्षी शिदोरीत भर पडायची. जर कुणी मावस-चुलत भावंड सुट्टीसाठी आली असतील तर या सगळ्याला अजूनच खुमार यायचा. अश्या भाऊ-बहिणींना दाखवायच्या निमित्तानी मग कोथरूडच्या बागेपासून संभाजी बाग, पेशवे पार्क, पर्वती, सर्पोद्यान, केळकर संग्रहालय या सगळ्यांना वार्षिक ठरलेली सहल घडायची. संध्याकाळी कुठे बाहेर जायचं नसलं तर मात्र कॉलोनी मधल्या ग्राउंड वर चिकार मित्र-मंडळी जमून धिंगाणा घालणे हा ठरलेला रोजचा कार्यक्रम व्हायचा. लपाछापी, पकडा-पकडी, झट-पट, आंधळी कोशिंबीर (या खेळाच्या नावात अशी अचानक कोशिंबीर का आहे हे मला अजूनही कळलं नाहीये), झुंजू-मुंजू, दगड का माती,खांब-खांब, डबडा-आईस-पाईस, खो-खो, धप्पा असे रोज नवे खेळ.. नवे नियम....नवी भांडणं.... :) टाईम प्लीज, नवा-गडी-नव-राज्य, एकावर नेम-सात-राज्य, चिडीचा डाव रडी या रिती भाती मात्र सगळ्या खेळात सारख्याच. खेळता खेळता अंधार पडायला लागला की अधून मधून नजर शेजारच्या मंदिरातल्या घड्याळावर जायची. सुट्टी साठीच फक्त ७ चं कसं बसं वाढवून मिळालेलं सव्वा-सातचं लिमिट मोडलं की होणारे दुष्परिणाम वाईट असायचे. त्यामुळे वेळेत घरी जाऊन जेवण, थोडा TV वगैरे झालं की बाबांच्या भोवती आमची भुणभुण सुरु व्हायची. आम्हाला उन्हाळ्याची सुट्टी लागली की खरं तर बाबांनाही उत्साह यायचा.... ते आपणहून गच्चीवर झोपायला जायचा प्रस्ताव मांडायचे. आमच्या गच्चीला चांगले कठडे नसल्यामुळे आई आणि आज्जी थोड्या नाखुशीनीच परवानगी द्यायच्या. मग गाद्या, उश्या, पांघरुण, मच्छरदाणी, टेबल lamp, एक्स्टेन्शन वायर, पुस्तक, पाण्याची बाटली असा सगळा संसार गोळा करून मोर्चा गच्चीकडे वळायचा. तिथे गाद्यांवर पहुडल्यावर कितीही पांघरूण गुरफटून घेतलं तरी हळूच वाऱ्याची गार झुळूक आत यायची आणि दिवसभर केलेल्या दंग्याचा शीण बरोबर घेऊन निघून जायची. बाबांनी आधी अनेक वेळा सांगितलेल्या त्याच त्या गोष्टी उघड्या आभाळाखाली, चांदण्यांकडे बघता बघता ऐकल्या की उगाच अजूनच गूढरम्य वाटायला लागायच्या आणि या वेळी कदाचित गोष्टीचा शेवट वेगळाच होईल की काय असं वाटायचं. गोष्ट ऐकता ऐकता, बाजूची हाताभराच्या अंतरावरची नारळाची डोलणारी झाडं बघता बघता डोळे जड व्हायला लागायचे.
असेच चटचट दिवस सरून महिना होत आला की मात्र हळूहळू " मला आयुष्यात कधी सुट्टीचा कंटाळा येणं शक्य नाही" या विश्वासावर शंका यायला लागायची. मग घरात गावाला जाण्याविषयीच्या चर्चेचे वारे वाहायला लागायचे आणि एखाद्या मावशी, आत्या, काका, आजोबा यांच्याकडे जाण्याचं निश्चित व्हायचं. गावाला जाण्याचा उत्साह हा रेल्वे प्रवास असेल तर दहा पटींनी वाढायचा आणि तरी प्रवासाच्या दिवशी रिक्षानी स्टेशन कडे जाताना दर वेळी न चुकता लागणारी ' पुणे सोडून दूर चालल्याची' हुरहूर लागायची. पण एकदा प्रवास सुरु झाला की आवळा-सुपारी, श्रीखंडाच्या गोळ्यांपासून सुरु होणारी चरन्ति अखंड चालू व्हायची आणि गाण्याच्या भेंड्या, पत्ते असे रेल्वे प्रवासात झालेच पाहिजेत असे सोपस्कार करता करता गाडी शेवटच्या स्टेशनवर यायची सुद्धा. मग जिथे कुठे गावाला गेलो असू तिथे भरपूर लाड करून घेऊन, भरपूर हिंडून, नातेवाईकांना भेटून, त्या त्या ठिकाणाचा स्पेशल चिवडा किंवा मिठाई वगैरे बांधून घेऊन परतीचा प्रवास सुरु व्हायचा आणि पुण्याला येताक्षणी परत सगळं ओळखीचं दिसल्यावर बरं वाटायचं.

प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत काही खास उपक्रम घडायचे. आई आणि आजी एखाद्या दिवशी लोणचं घालायचा घाट घालायच्या. बाबांबरोबर मंडई मध्ये जाऊन आई कैऱ्या फोडून आणायची आणि घरी आली की तो कच्च्या कैऱ्यांचा घमघमाट स्वस्थ बसूच द्यायचा नाही. आम्ही एक एक फोड तोंडात टाकत कैऱ्या धुवून, पुसून देणे अश्या कौशल्यहीन कामांना हातभार लावायचो. मसाला कालवला की 'या वर्षीचा लोणचं मागच्या वर्षीच्या लोणच्यापेक्षा जास्त लाल, झणझणीत होणार आहे की नाही ' याचे अंदाज बांधून पैज लावायचो. असाच अजून एक उत्साहाचा दिवस पापडांचा असायचा. साबुदाण्याच्या वाळायला ठेवलेल्या पापड्या कच्च्या असतानाच अर्ध्या संपायच्या आणि वर वर रागावणाऱ्या आईला पण मधूनच एखादी कच्ची पापडी खायचा मोह आवरायचा नाही. :)

असं होत होत अचानक कधी तरी कालनिर्णय चं पान उलटायचं आणि पहिल्या पावसाचे वेध लागायचे. सहसा नव्या पुस्तक वह्यांचा आणि मातीचा सुगंध पाठोपाठच घरात यायचा. शाळेच्या नव्या वर्षाची उत्सुकता डोक्यात आणि पहिल्या पावसाची चाहूल हवेत असतानाचा तो काळ खूप मजेदार असायचा. तो असाच चालू रहावा असं वाटत असतानाच जोरात वारा सुटायचा आणि काही कळायच्या आत पहिल्या सरी येऊन बिलगायच्या. पहिल्या पावसात भिजलो नाही असा एकही उन्हाळा संपायचा नाही. कधी गारा वेचत, कधी चिखलात उड्या मारत, मातीचा वास उरात भरून घेत तर कधी सायकल वर टांग टाकून गावभर फिरत, वरून येणारा प्रत्येक थेंब झेलायची पराकाष्टा करत उन्हाळ्याचा अंत साजरा केला जायचा. जेवढी तळमळीनी उन्हाळ्याची वाट पाहिली जायची ती सुट्टीतल्या या अश्या हजार आनंदी क्षणांनी सार्थ व्हायची आणि गालावर ओघळणाऱ्या अश्रूंनी नव्हे, पण पहिल्या टपोऱ्या थेंबानी, प्रेमानी उन्हाळ्याला निरोप दिला जायचा. अशी लाडकी उन्हाळ्याची सुट्टी ... कलिंगडाच्या फोडीसारखी गोड आणि कैरीसारखी आंबट ... उसाचा रस, कोकम सरबत आणि पन्ह्यासारखी तोंडाला पाणी आणणारी उन्हाळ्याची सुट्टी... कोकिळेच्या गोड गाण्यासारखी... सूर्यास्ताच्या रंगीबेरंगी पश्चीमेसारखी ... काटे-सावरी च्या हातातून निसटणाऱ्या म्हातारी सारखी उन्हाळ्याची सुट्टी ...'पुढल्या वर्षी लवकर ये' असं न सांगताही नियमित येणारी उन्हाळ्याची सुट्टी...

विचारात, सुट्टीच्या आठवणींमध्ये एवढी गुरफटून गेले होते की भान आलं तेंव्हा जाणवलं... दुपार होऊन गेलीये ... भूक लागलीये... मग अंगाला सन स्क्रीन फासून, डोळ्यावर गॉगल चढवून, AC घरातून बाहेर पडले... AC बस मधून AC मॉल मध्ये जाण्यासाठी. विरोधाभास खूप मोठा होता हे जाणवून हसू आलं. शेवटी न राहवून गॉगल काढला तशी त्या वरून तळपणाऱ्याची करडी नजर टोचली. पण उन्हाच्या त्या चटक्यात सुद्धा चेहऱ्यावरचं हसू तसंच राहिलं. त्यालाही बहुदा ओळखीची काही तरी खूण पटली असावी.. तो समाधानी हसला आणि ढगाआड गेला.


________ जुई चितळे


ऋतुगंध- वसंत 2011, (सिंगापूर) मध्ये पूर्व-प्रकाशित