Monday, March 12, 2012

पोरकेपण



पायातलाच चिरा ढासळल्यावर 
आधाराच्या भिंतीही पोरक्या झाल्या
आधी छत चंद्रमौळी होते
आता तारकाच कौलारू झाल्या 

बंधाराच फुटून गेला तर 
वाहणाऱ्याला काय त्याचे?
इकडे उरली व्याकूळ तहान 
तिकडे कल्लोळत पूर नाचे 

थेंबभर मनात झालीये अगदी  
आभाळभर प्रश्नांची दाटी
आता फिरतेय शोधत उत्तरं
शिदोरीत बांधून मुळातली माती 
________ जुई 

गाठी

(गुलझार यांच्या 'जुलाय्हा' या कवितेवरून प्रभावित )

हाताशी मोकळा वेळ असला की मी आठवणींचा गुंता समोर घेउन बसते 
एक एक गाठ सोडवताना 
कित्येक धरून ठेवलेली, निसटून गेलेली माणसे भेटतात 
काही लक्ख, काही धूसर प्रसंग आठवतात  
तोपर्यंत दुसरीकडे पुन्हा गुंता झालेला असतो.
एकदा मात्र एक सुट्टे टोकच लागले हाताला 
त्याला धरून मागे जाता जाता त्याच्या दुसऱ्या टोकाशी तू भेटलास
मागे एकदा असंच एक टोक स्वतःकडे ठेवून, 
मध्ये घट्ट गाठ बांधून, दुसरं टोक माझ्याकडे दिलं होतंस.
म्हणाला होतास "गाठी या वरतीच बांधलेल्या असतात!
असेल आपली पक्की तर टिकेल"
नंतर आपापल्या मार्गांनी जाताना ...
दोन्हीकडून ओढ बसायला लागली.
पण त्यामुळे मधली गाठ अजूनच घट्ट झाली का?
कदाचित हो.... कदाचित नाही...
आपापल्या टोकाशी झालेला गुंता सोडवताना 
दोघांनाही बहुदा ,
मागे वळून पुन्हा त्या गाठीकडे बघण्याचं धैर्य झालं नाही 
आता फक्त सुतासारख्या सरळ तुझ्या आठवणीच तेवढ्या उरल्या 
_________ जुई