Thursday, December 8, 2011

तो येतो आणि...

आधी कळवतो की 'येईन'
आपणही तयारी करतो त्याच्या स्वागताची
पण त्याच्या शब्दावर विश्वास कसा  ठेवावा?
वाट बघण्यातच आपले चार दिवस निघून जातात
रोजची कामं आपण सुरळीत चालू करतो
आणि मग अचानक, एखाद्या सकाळी सकाळी
दाणकन येतो सगळ्या लवाजम्या सकट
अंगणात, घरात, झोपेत, मनात, विचारात असा शिरतो...
आणि सगळीकडे पसारा करून ठेवतो.
आपली कमालीची धांदल उडते
पण तरी त्याच्यावर रागवावं असं वाटत नाही...

झाडांच्या डोक्यावर टपली मारून त्यांची पानं-फुलं खाली पाडतो
वाफे-आळी मोडून लहान लहान ओहोळांना पकडा - पकडी खेळायला सोडून देतो
पागोळ्यांची माळ तोडून ओसरीवर मोती पसरवून ठेवतो
मातीचा रंग अंगणभर सांडून ठेवतो
छपरावर नाचून नाचून अगदी गोंगाट माजवतो
तरी त्याच्यावर रागवावं असं वाटत नाही...

दाराला लावलेले उबेचे पडदे विस्कटून घरभर गारवा पसरून ठेवतो
आल्याचा चहा आणि कांदा भजीच पाहिजेत असा हट्ट करत,
स्वयंपाकघराच्या खिडकीत ठाण मांडून बसतो.
गौड मल्हार, मेघ, मिया मल्हार... सगळ्यांचे सूर एकच वेळी उधळायची घाई करतो
सगळ्या कामांना बुट्टी देऊन त्याच्याबरोबर भटकायला जायची गळ घालतो
तुषार, चैतन्य, प्रफुल्ल, हर्ष अश्या ढीगभर मित्रांना गोळा करून नुसता दंगा घालतो
तरी त्याच्यावर रागवावं असं वाटत नाही...

कपाटात कोंबलेल्या सगळ्या निळ्या- हिरव्या आठवणी खसकन बाहेर ओढून काढतो
लहानपणी दोघांनी मिळून सोडलेली होडी कुठपर्यंत पोचली विचारत राहतो
त्याच्या आणि माझ्या हातात हात गुंफून काही काळ नाचलेल्या त्या तिसऱ्याची चौकशी करतो
फक्त त्यालाच सांगितलेली गुपिते फोडायची धमकी देतो
दिवसभर भंडावून सोडल्यावर पुन्हा रात्री स्वप्नात येऊन चिडवत राहतो
तरीही त्याच्यावर रागवावं असं वाटत नाही...


माझ्या चिमुकल्या अंगणात उत्साह भरून जातो...
माझ्या एकट्या घराला जिवंत करून जातो...
माझ्या व्याकूळ मनाला सोबत करून जातो...
सांगून जातो की पुन्हा येईन,
पण त्याच्या शब्दावर विश्वास कसा ठेवावा?


_ जुई

Friday, May 13, 2011

उन्हाळ्याची सुट्टी !



शनिवारचा दिवस. सुट्टीचा. आदल्या दिवशी ऑनलाइन सिनेमा बघत झोपायला खूप उशीर झाल्यामुळे साहजिकच उशिरा उठले होते. डोकं जड झालं होत. जवळ जवळ जेवणाची वेळ होत आली असली तरी 'ब्रेकफास्ट सीरियल्स' आणि दुधाचा बाउल घेऊन स्वयंपाक घराच्या खिडकी पाशी उभी होते. खरं तर सकाळी तिथून छान कोवळं ऊन आत येतं... पण आता सूर्य चांगला डोक्यावर आलेला होता. हवेत थोडी धग जाणवत होती. सिंगापूर असून चक्क ३-४ दिवस पाऊस पडला नव्हता. आत जाऊन बेडरूम मध्ये AC च्या गारव्यातच बसावं असा विचार करत होते तेवढ्यात खालून खूप आरडा-ओरडा ऐकू आला. पाहिलं तर ७-८ लहान मुलांचा दंगा चालू होता. मग लक्षात आलं, की अरे एप्रिल महिना सुरू झालाय.... या मुलांच्या परीक्षा संपून मस्त सुट्टी चालू झाली असेल. एप्रिल-मे म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीचाच सीझन! उच्च शिक्षणासाठी किंवा नोकरी वगैरे कोणत्याही कारणानी घर, घरची माणसे, देश सोडून एवढ्या लांब आल्यावर हा काळ आपोआप सुट्टीचा न राहता फक्त उन्हाळ्याचा किंवा स्प्रिंग चा होऊन गेला होता आणि कामाच्या व्यापात, नव्या जीवन-पद्धतीशी जुळवून घेताना, रोजच नव्या परीक्षांना सामोरे जात काळाच्या बरोबर चालायच्या प्रयत्नात, मी 'आपण कधी तरी लहान होतो आणि आपल्याला दर वर्षी २ महिने पूर्ण-निव्वळ-बिना भेसळ सुट्टी असायची' हे विसरुनच गेले होते. घशातला खोलवरचा आवन्ढा गिळून आत जाऊन बसले पण उन्हाळ्याच्या सुट्टीची आठवण स्वस्थ बसू देई ना... एक एक गोष्ट डोळ्यासमोर यायला लागली.......उन्हाळ्याची सुट्टी... माझी लहानपणची, पुण्यातली उन्हाळ्याची सुट्टी कशी असायची?

वार्षिक परीक्षेच्या शेवटच्या पेपरची एवढी आश्चर्यकारक ओढ लागलेली असायची आणि कधी एकदा ती शेवटची उत्तर-पत्रिका देऊन टाकतोय असं झालेलं असायचं. कारण शेवटच्या पेपरचा दिवस हा परीक्षेत गणला जायचाच नाही. पुढच्या दोन महिन्याच्या पोटभर सुट्टीचा पहिला घास असायचा तो दिवस! अगदी लहानपणी जेंव्हा रिक्षावाले काका शाळेत सोडायचे-आणायचे तेंव्हा शेवटच्या दिवशी ते सरळ घरी आणून न सोडता आधी गुह्राळात घेऊन जायचे. उसाचा रस, त्यात हवा तेवढा बर्फ, (घे, घे.. मी नाही सांगणार तुझ्या आईला!),मग कधी कधी वडापाव आणि शेवटी पाण्याची रंगपंचमी(?) खेळून, चिकार दंगा करून आणि रिक्षात तश्याच ओल्या कपड्यांनी आणि चपला-बुटांनी भरपूर राडा करून मग आमचं ध्यान घरी पोचायचं आणि घरात पाउल टाकल्या टाकल्या आकाशवाणी च्या आविर्भावात एक घोषणा केली जायची "हुर्रे... माझी उन्हाळ्याची सुट्टी सुरू झालेली आहे. आता मी खूप मज्जा करणार आहे आणि हवं तसं वागणार आहे...!" याला खर तर फार काही अर्थ नसायचा कारण हवं तसं वागता येणं म्हणजे काय हे तेंव्हा नाही कळायचं घरात राहून :)

परीक्षा चालू असतानाच सुट्टीच सगळं प्लानिंग झालेलं असायचं... त्यात दिवसाची सुरुवात कधीही झाली तरी त्यातला सकाळचा बराचसा वेळ हा कॅर्रोम, पत्ते वगेरे खेळण्यात घालवलाच पाहिजे असा एक नियम असायचा. अधून मधून कुतूहल आणि नाविन्य म्हणून सागरगोटे, सारीपाट असे आज्जीनी सुचवलेले खेळ व्हायचे पण त्यांचा जास्त टिकाव लागायचा नाही. लहान भावांना कटवून गुपचूप आम्ही 'मोठ्या' मुली एखादी च्या घरी 'घर-घर' सुद्धा खेळायचो. त्यात चुरमुऱ्याच्या पोळ्या आणि दाणे-गूळ यांचा लाडू करताना भारी वाटायचं.. पण त्यांनी पोट भरलं नाही की आपोआप घराकडे पाय वळायचे... दुपारच्या जेवणाची वेळ झालेलीच असायची तोपर्यंत. उन्हाळ्यातल्या जेवणाला मात्र काय साज असायचा! नेहेमीचीच भाजी-पोळी, पण त्या शेजारी आमरसाची वाटी आली की साध्या साडीचं जरतारी काठ-पदर लावल्यावर पैठणीत रुपांतर व्हावं तसं काहीसं व्हायचं. लहानपणी कधी हापूस साठीच असा हट्ट केल्याचा आठवत नाही. पायरी, केशर, गोटी ... कोणताही आंबा असला तरी त्याचा तोंडात मावणार नाही एवढा घास म्हणजे 'अहाहा' ! तूप किंवा दूध आणि मिरपूड वगैरे घालून साग्रसंगीत आमरस आताही कधी खाल्ला की त्याच्या चवीबरोबर उन्हाळ्याची सुट्टी जिभेवर रेंगाळायला लागते. 

दुपारच्या जेवणा नंतर 'खूप ऊन आहे, आत्ता अजिबात घरा बाहेर पडायचं नाही .. नाही तर ....' अश्या धमकीचा मान राखून घरातल्या घरात नवनवीन उद्योग सुरु व्हायचे. कुंडीतल बागकाम, वाचन, चित्रकला, सरबतानी भरलेला पेला फ्रिझमध्ये ठेवून त्याचं आईस-क्रीम होतं का याचे प्रात्यक्षिक प्रयोग, भरतकाम करून उशीचा अभ्रा विणता यावा या प्रयत्नात हातरुमालापर्यंतच टिकलेला उत्साह अश्या या ना त्या गोष्टींची दर वर्षी शिदोरीत भर पडायची. जर कुणी मावस-चुलत भावंड सुट्टीसाठी आली असतील तर या सगळ्याला अजूनच खुमार यायचा. अश्या भाऊ-बहिणींना दाखवायच्या निमित्तानी मग कोथरूडच्या बागेपासून संभाजी बाग, पेशवे पार्क, पर्वती, सर्पोद्यान, केळकर संग्रहालय या सगळ्यांना वार्षिक ठरलेली सहल घडायची. संध्याकाळी कुठे बाहेर जायचं नसलं तर मात्र कॉलोनी मधल्या ग्राउंड वर चिकार मित्र-मंडळी जमून धिंगाणा घालणे हा ठरलेला रोजचा कार्यक्रम व्हायचा. लपाछापी, पकडा-पकडी, झट-पट, आंधळी कोशिंबीर (या खेळाच्या नावात अशी अचानक कोशिंबीर का आहे हे मला अजूनही कळलं नाहीये), झुंजू-मुंजू, दगड का माती,खांब-खांब, डबडा-आईस-पाईस, खो-खो, धप्पा असे रोज नवे खेळ.. नवे नियम....नवी भांडणं.... :) टाईम प्लीज, नवा-गडी-नव-राज्य, एकावर नेम-सात-राज्य, चिडीचा डाव रडी या रिती भाती मात्र सगळ्या खेळात सारख्याच. खेळता खेळता अंधार पडायला लागला की अधून मधून नजर शेजारच्या मंदिरातल्या घड्याळावर जायची. सुट्टी साठीच फक्त ७ चं कसं बसं वाढवून मिळालेलं सव्वा-सातचं लिमिट मोडलं की होणारे दुष्परिणाम वाईट असायचे. त्यामुळे वेळेत घरी जाऊन जेवण, थोडा TV वगैरे झालं की बाबांच्या भोवती आमची भुणभुण सुरु व्हायची. आम्हाला उन्हाळ्याची सुट्टी लागली की खरं तर बाबांनाही उत्साह यायचा.... ते आपणहून गच्चीवर झोपायला जायचा प्रस्ताव मांडायचे. आमच्या गच्चीला चांगले कठडे नसल्यामुळे आई आणि आज्जी थोड्या नाखुशीनीच परवानगी द्यायच्या. मग गाद्या, उश्या, पांघरुण, मच्छरदाणी, टेबल lamp, एक्स्टेन्शन वायर, पुस्तक, पाण्याची बाटली असा सगळा संसार गोळा करून मोर्चा गच्चीकडे वळायचा. तिथे गाद्यांवर पहुडल्यावर कितीही पांघरूण गुरफटून घेतलं तरी हळूच वाऱ्याची गार झुळूक आत यायची आणि दिवसभर केलेल्या दंग्याचा शीण बरोबर घेऊन निघून जायची. बाबांनी आधी अनेक वेळा सांगितलेल्या त्याच त्या गोष्टी उघड्या आभाळाखाली, चांदण्यांकडे बघता बघता ऐकल्या की उगाच अजूनच गूढरम्य वाटायला लागायच्या आणि या वेळी कदाचित गोष्टीचा शेवट वेगळाच होईल की काय असं वाटायचं. गोष्ट ऐकता ऐकता, बाजूची हाताभराच्या अंतरावरची नारळाची डोलणारी झाडं बघता बघता डोळे जड व्हायला लागायचे.
असेच चटचट दिवस सरून महिना होत आला की मात्र हळूहळू " मला आयुष्यात कधी सुट्टीचा कंटाळा येणं शक्य नाही" या विश्वासावर शंका यायला लागायची. मग घरात गावाला जाण्याविषयीच्या चर्चेचे वारे वाहायला लागायचे आणि एखाद्या मावशी, आत्या, काका, आजोबा यांच्याकडे जाण्याचं निश्चित व्हायचं. गावाला जाण्याचा उत्साह हा रेल्वे प्रवास असेल तर दहा पटींनी वाढायचा आणि तरी प्रवासाच्या दिवशी रिक्षानी स्टेशन कडे जाताना दर वेळी न चुकता लागणारी ' पुणे सोडून दूर चालल्याची' हुरहूर लागायची. पण एकदा प्रवास सुरु झाला की आवळा-सुपारी, श्रीखंडाच्या गोळ्यांपासून सुरु होणारी चरन्ति अखंड चालू व्हायची आणि गाण्याच्या भेंड्या, पत्ते असे रेल्वे प्रवासात झालेच पाहिजेत असे सोपस्कार करता करता गाडी शेवटच्या स्टेशनवर यायची सुद्धा. मग जिथे कुठे गावाला गेलो असू तिथे भरपूर लाड करून घेऊन, भरपूर हिंडून, नातेवाईकांना भेटून, त्या त्या ठिकाणाचा स्पेशल चिवडा किंवा मिठाई वगैरे बांधून घेऊन परतीचा प्रवास सुरु व्हायचा आणि पुण्याला येताक्षणी परत सगळं ओळखीचं दिसल्यावर बरं वाटायचं.

प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत काही खास उपक्रम घडायचे. आई आणि आजी एखाद्या दिवशी लोणचं घालायचा घाट घालायच्या. बाबांबरोबर मंडई मध्ये जाऊन आई कैऱ्या फोडून आणायची आणि घरी आली की तो कच्च्या कैऱ्यांचा घमघमाट स्वस्थ बसूच द्यायचा नाही. आम्ही एक एक फोड तोंडात टाकत कैऱ्या धुवून, पुसून देणे अश्या कौशल्यहीन कामांना हातभार लावायचो. मसाला कालवला की 'या वर्षीचा लोणचं मागच्या वर्षीच्या लोणच्यापेक्षा जास्त लाल, झणझणीत होणार आहे की नाही ' याचे अंदाज बांधून पैज लावायचो. असाच अजून एक उत्साहाचा दिवस पापडांचा असायचा. साबुदाण्याच्या वाळायला ठेवलेल्या पापड्या कच्च्या असतानाच अर्ध्या संपायच्या आणि वर वर रागावणाऱ्या आईला पण मधूनच एखादी कच्ची पापडी खायचा मोह आवरायचा नाही. :)

असं होत होत अचानक कधी तरी कालनिर्णय चं पान उलटायचं आणि पहिल्या पावसाचे वेध लागायचे. सहसा नव्या पुस्तक वह्यांचा आणि मातीचा सुगंध पाठोपाठच घरात यायचा. शाळेच्या नव्या वर्षाची उत्सुकता डोक्यात आणि पहिल्या पावसाची चाहूल हवेत असतानाचा तो काळ खूप मजेदार असायचा. तो असाच चालू रहावा असं वाटत असतानाच जोरात वारा सुटायचा आणि काही कळायच्या आत पहिल्या सरी येऊन बिलगायच्या. पहिल्या पावसात भिजलो नाही असा एकही उन्हाळा संपायचा नाही. कधी गारा वेचत, कधी चिखलात उड्या मारत, मातीचा वास उरात भरून घेत तर कधी सायकल वर टांग टाकून गावभर फिरत, वरून येणारा प्रत्येक थेंब झेलायची पराकाष्टा करत उन्हाळ्याचा अंत साजरा केला जायचा. जेवढी तळमळीनी उन्हाळ्याची वाट पाहिली जायची ती सुट्टीतल्या या अश्या हजार आनंदी क्षणांनी सार्थ व्हायची आणि गालावर ओघळणाऱ्या अश्रूंनी नव्हे, पण पहिल्या टपोऱ्या थेंबानी, प्रेमानी उन्हाळ्याला निरोप दिला जायचा. अशी लाडकी उन्हाळ्याची सुट्टी ... कलिंगडाच्या फोडीसारखी गोड आणि कैरीसारखी आंबट ... उसाचा रस, कोकम सरबत आणि पन्ह्यासारखी तोंडाला पाणी आणणारी उन्हाळ्याची सुट्टी... कोकिळेच्या गोड गाण्यासारखी... सूर्यास्ताच्या रंगीबेरंगी पश्चीमेसारखी ... काटे-सावरी च्या हातातून निसटणाऱ्या म्हातारी सारखी उन्हाळ्याची सुट्टी ...'पुढल्या वर्षी लवकर ये' असं न सांगताही नियमित येणारी उन्हाळ्याची सुट्टी...

विचारात, सुट्टीच्या आठवणींमध्ये एवढी गुरफटून गेले होते की भान आलं तेंव्हा जाणवलं... दुपार होऊन गेलीये ... भूक लागलीये... मग अंगाला सन स्क्रीन फासून, डोळ्यावर गॉगल चढवून, AC घरातून बाहेर पडले... AC बस मधून AC मॉल मध्ये जाण्यासाठी. विरोधाभास खूप मोठा होता हे जाणवून हसू आलं. शेवटी न राहवून गॉगल काढला तशी त्या वरून तळपणाऱ्याची करडी नजर टोचली. पण उन्हाच्या त्या चटक्यात सुद्धा चेहऱ्यावरचं हसू तसंच राहिलं. त्यालाही बहुदा ओळखीची काही तरी खूण पटली असावी.. तो समाधानी हसला आणि ढगाआड गेला.


________ जुई चितळे


ऋतुगंध- वसंत 2011, (सिंगापूर) मध्ये पूर्व-प्रकाशित 

Sunday, April 17, 2011

शोधा गं ..


शोधा गं ... शोधा गं...फांदी -फांदीवर शोधा गं....
हाती जे जे येईल त्याचा प्रत्यय नसेल साधा गं...

खोपा गं... खोपा गं ... फांदी-फांदी वर खोपा गं ...
गोजिरवाण्या संसारातच सुखाचा रस्ता सोपा गं....

झोका गं... झोका गं ...फांदी-फांदी वर झोका गं...
अवखळ निर्भीड उत्साहातच आयुष्याच्या मौजा गं ...

धोका गं ... धोका गं...फांदी-फांदी वर धोका गं...
खळगे-काटे-साप-मुंगळे चुकवत जगणे शिका गं...

मोहोर गं.. मोहोर गं... फांदी-फांदी वर मोहोर गं...
फुला -फळांच्या रस-स्वादाची गोडी केवळ थोर गं...

पाचोळा गं... पाचोळा गं... सांदी-फटीतून पाचोळा गं...
बहरा अंती सुकण्याचा ना नियम चुकला कोणा गं...

थांब गं... थांब गं... फांदी कुठेशी सांग गं...?
फांदी -फांदी जोडत जाता झाडच मिळते अखंड गं.... 

_ जुई 

Monday, March 28, 2011

चंद्र अवचित...

तशी मीही अजून जागीच आहे...
पण निजेला परतवते आहे ... कारण तू ही जागा आहेस.

चल,
वाऱ्यावर तरंगत आलेल्या या मोहक क्षणाचा हात धर...
आणि मांजर-पावलांनी अलगद ये माझ्या बरोबर...
तशी आपल्या सुखाची फुलं उमलली आहेतच ...
पण हवेत सुगंध भरलाय... तो बहुदा चांदण्यांचा.

ऐक,
सगळीकडची निरव शांतता... 
निश्वासांचे हुंकार सुद्धा विरघळून गेल्यासारखी ... 
तशी मी तुझ्या कानात गुज सांगते आहे...
पण कुठूनशी कुजबुज ऐकू येतीये ... ती रातराणीची 

बघ, 
सगळं शहर झोपेच्या धुक्यात बुडलंय.
त्याच्या वर-खाली होणाऱ्या श्वासांच्या लाटेवर झुलताना वाराही मंद झालाय...
तसा थोडा गारवा आहे हवेत...
पण शहारा आलाय... तो तुझ्या स्पर्शामुळे...

थांब,
बोलू नकोस काही ... आणि हलू नको जरासुद्धा..
हा क्षण संपण्याआधी साठवून घे मला तुझ्यात..
तशी पौर्णिमाच आहे आज...
पण चंद्र अवचित ग्रासलाय ... तो तुझ्या माझ्या एकांतासाठी...

___जुई


Monday, March 21, 2011

तुकडे

खिडकीवर सारलेल्या गडद पडद्याच्या फटीतून  
एक कोवळी तिरीप पाझरली 
आणि तुझ्याशी ओळख झाली 
त्या सोनेरी तुकड्यामुळे  ...

नंतर मग ...
वेगवेगळ्या झरोक्यातून, खिडक्यांतून, दारातून
आत आलेले ते पिवळे, निळे, राखाडी, सप्तरंगी तुकडे 
माझ्याशी लपा-छपी खेळत राहिले...
भिंगातून संकोचलेले...
गजांमध्ये दुभागलेले...
डबक्यामध्ये विरघळलेले ...
चष्म्याच्या आड काळवंडलेले ...
फाटक्या छपरातून सांडलेले...
असंख्य तुकडे.

अश्या तुकड्या-तुकड्यांमधून हुलकावणी देणारा तू 
आणि ते झेलताना भान हरपलेली ध्यासवेडी मी...
कधी त्यातून तुझं चित्र  साकारतंय का बघणारी,
कधी त्यात तुझं प्रतिबिंब उमटतंय का याची वाट पाहणारी,
कधी त्यातून तुझी मूर्ती घडतीये का शोधणारी...

जसजसे तू उधळत असलेल्या तुकड्यांचे रंग होऊ लागले गडद ...
आणि कंगोरे अधिक बोचरे,
तसतशी मी शहाणी होत गेले...
कितीही सांधले तरी तुझं आदिम, अनंत रूप त्या तुकड्यात थोडंच भेटणार होतं मला...
ते झेलण्यासाठी त्यांच्या मागे धावताना मला माझी वाट मात्र सापडली.
मग तुझी निशाणी म्हणून त्यातला एक पारदर्शी तुकडा डोळ्यात बसवून घेतला, 
आणि बाकीचे सोडून दिले ओंजळीतून खाली...

पुढे जाताना फक्त एकदा मागे वळून पाहिलं तेंव्हा दिसला...
एक सोनेरी तुकडा,
कुठल्याश्या गडद पडद्याच्या फटीतून 
आत झिरपताना...

___ जुई

Wednesday, March 2, 2011

किंकर जी

        पूर्वी किंकर नावाचे एक गृहस्थ आजोबांना भेटायला यायचे अधून मधून... ते ही वयानी आजोबांच्या एवढेच असतील. आम्ही त्यांना किंकर जी म्हणायचो. बिहार मधल्या  मंदार पर्वताच्या पायथ्याशी यांचं सीमा नावाचं गाव. आजोबांसारखे ते ही खादी च्या संस्थेशी निगडीत. भरपूर प्रवास करायचे. ते पुण्यात आल्यावर आम्हाला घराचा जिना चढतानाच कळायचं की किंकर जी आलेत... सरसो (सरसो म्हणजेच मोहोरी) तेलाच्या वासावरून.... (?) ! डोक्याला, अंगाला रोज न चुकता सरसो चं तेल लावायची त्यांना सवय होती... एवढंच काय सरसो-तेलाच्या वासाच्याच साबणानी ते कपडे धुवायचे. आले की ४-५ दिवस मुक्कामासाठीच यायचे... आमच्या कपाळाला आठ्या यायच्या. आज्जी च्या चेहऱ्यावरचा वैताग तर बघण्यासारखा असायचा. तिचं नाक जरा जास्त तिखट होतं. कोणताही वास तिला पटकन यायचा आणि न आवडणारा वास असेल तर तिला अगदी नको-नको होऊन जायचं. ते परत गेले की आज्जी घरातले सगळे कपडे धुवायला काढायची... अगदी चादरी, अभ्रे, पडद्यांसकट... !


             तर असे हे किंकर जी... अंगानी चांगले सुधृढ ... सरसो च्या कृपेमुळे डोक्यावर या ही वयात भरपूर बाल-सेना :) पांढरा सैलसर झब्बा आणि तसाच ढगाळ पायजमा... बरोबरचं समान सुद्धा ऐस-पैस. चेहऱ्यावर कायम (एक तेलकट थर आणि ) एक उगाच हसू. एकदा आले की त्यांच्या खास उत्तर भारतीय मिठास वाणीने सगळ्यांचं कौतुक करतील.... गोड बोलून अक्षरशः दिल जीत लेतील वगैरे... कितीही आमंत्रण दिलं तरी तुम्ही आमच्या कडे येत नाही म्हणून लटके रागावतील. 'अरे ओ बिटिया.... दादाजी की लाडली है ना?' ... असं म्हणत माझ्या हातावर खाऊ चा पुडा ठेवतील... शक्यतो त्या पुड्यात पेठा असेल. आणि क्वचितच मिळणारा हा खाऊ चाखून आम्ही हमखास खुश होऊन जाऊ... मग आजोबांशी मोठमोठ्या आवाजात संस्थेतल राजकारण बोलत बसतील. आमच्या इमारतीमधल्या सगळ्या १४ घरांना खडा न खडा ऐकू जाईल असं घडाघडा बोलणं. तशी यांची खडाजंगी पहाटेपासूनच सुरु होईल... पहाटे ४ वाजता मोजून ४० वाटणे भिजत घालतील...दिवा  लावल्याने झोपमोड होऊ नये म्हणून अंधारात  आणि मोजता यावे म्हणून  स्टील च्या भांड्यात सुमारे २ वीत उंचीवरून एक एक वाटणा मोजत टाकतील.. टण टण टण.... ते भिजवलेले वाटणे रोज न चुकता खायचे. मग प्राणायाम करायचा चांगला तासभर.. मग अंघोळीची तयारी... ती सर्वांगाला सरसो-भिषेक करूनच! त्यांचा कसं... सगळं जाहीर. छुपं काही नाही. घरात असतील तोपर्यंत दृक-श्राव्य-वासिक (?)  अश्या सगळ्या माध्यमातून जाणवत राहतील. तशी किंकर जींची आम्ही कितीही चेष्टा केली तरी त्यांच्या कामाबद्दल भरपूर आदरही होता. किंकर जींनी त्यांच्या तैल-बुद्धी नी ध्येयवादी योजना आखून उत्तर भारतातलं एक पूर्ण गाव स्वावलंबी करून दाखवलं होतं. बाहेरच्या कोणत्याही गावाची, शहराची मदत नाही मिळाली तरी अन्न-वस्त्र-निवारा या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी कोणावर अवलंबून रहायची गरज त्या गावावर पडणार नव्हती. गावातली एकही व्यक्ती बेरोजगार नव्हती आणि एकही संसार खायची भ्रांत पडून काळजीनी  सुकलेला नव्हता.  स्वतःच्या आयुष्यात सुद्धा पूर्ण स्वावलंबी असलेले, स्वतःचे कपडे स्वतः कातलेल्या सुताचेच वापरणारे असे मनस्वी होते किंकर जी ...
           नंतर त्यांच्या पुण्याला चकरा कमी कमी व्हायला लागल्या. पत्रं मात्र नियमित यायची. खालच्या पोस्टाच्या पेटीतून मी आमची पत्र गोळा करताना त्यांचं पत्र हातात यायचं तेंव्हा त्याच्या किंचित ओशट-तेलकट स्पर्शावरूनच कळायचं त्या पत्राचा प्रेषक कोण आहे ते. मी उत्साहानी पळत पळत जाऊन पत्र आजोबांच्या हातात द्यायचे. उत्साह एवढ्याच साठी की किंकर जींच नाव घेताच आज्जी काही ना काही तरी टोमणा मारायची आणि मग आज्जी-आजोबांमधली टोलवा-टोलवी  बघायला आम्हाला जाम मजा यायची. आजोबा मधेच वाचून दाखवायचे की 'आयुष्मती बिटिया को बहोत सारा प्यार' असं लिहिलंय ग तुझ्या साठी. पण पत्राचा शेवट वाचेपर्यंत आजोबांचा चेहरा पडत पडत जायचा. नंतर नंतर आज्जी सुद्धा दबलेल्या आवाजात विचारायची " जास्ती आहे का हो त्यांचं? बघून या हवं तर एकदा." 

            आता आज्जी नाही. आजोबा ही गेले. किंकरजींचं पुढे काय झालं कोणास ठाऊक? काही कळावं म्हणून पुढाकार घेऊन काही केलंही नाही. त्यांना किंवा त्यांच्या पत्राला शेवटच बघूनही आता बरीच वर्ष झाली. आज दुकानात चुकून हाती आलेल्या सरसो तेलाच्या बाटली वरून त्यांची आठवण आली. आणि आता आठवण आली आहे तर ती जाता जात नाहीये. छळते आहे. 

             जेंव्हा किंकर जी आणि आजोबा त्यांच्या कामाविषयी चर्चा करायचे तेंव्हा त्यांना अक्षरशः स्थळ-काळाचं भान उरायचं नाही. कधी कधी आज्जी ही गंभीरपणे  त्यांचं बोलणं ऐकत, मध्येच एखादा मुद्दा मांडत तिथेच बसून रहायची. सगळं तारुण्य स्वातंत्र्यासाठी खर्ची घातलेली आणि मग बाकीचं आयुष्य गांधी आचार-विचार आणि खादी चा प्रचार-प्रसार करण्यासाठी वाहून टाकलेली ती तीन पिकलेली माणसं त्या ही वयात कोणत्या ध्येयानी भारावून बोलायची? वाद घालायची? तेंव्हा त्यांचं बोलणं सगळं कळण्याएवढी  मी मोठी नव्हते. पण त्या बोलण्यातली कळकळ  मात्र जाणवायची. आता खूप ओढ लागते हे जाणून घेण्यासाठी की कुठून एवढी उर्जा त्यांनी मिळवली होती? आत्ता आपण जे काम करतोय तसं वयाच्या ७५ व्या वर्षी सुद्धा तेवढ्याच उत्साहानी पेटून करू शकू का असा विचार माझ्या मनात आला. तेंव्हाचा काळही वेगळा होता आणि प्रश्नही वेगळे होते. त्यांना जे पटलं होतं ते काम त्यांनी आयुष्यभर निष्ठेनी केलं. आपण करत आहोत ते काम किती गरजेचं, महत्वाचं आणि उपयुक्त आहे याची दृष्टी त्यांना होती. पैसा कमीच मिळाला पण बहुदा समाधान आणि काही तरी करून दाखवल्याची भावना मात्र अनिवार मिळवली. आताच्या काळात पैसा, नाव मिळवण्याचं ध्येय ठेवण्यात काही चूक नाही. आपणही काही तरी सामाजिक कामच आयुष्यभर केलं पाहिजे असंही म्हणणं सार्थ नाही. पण निदान स्वतःला अतिशय पटणारं, आवडणारं आणि ज्यातून काम केल्याचं समाधान मिळेल असं काही तरी केलं पाहिजे असं म्हणण्यात काही वावगं नाही ना? 

            मी ती सरसो तेलाची बाटली विकत घेतली... आणि घरी येऊन ती स्वयंपाक घरात न ठेवता बाहेरच्या शो-केस मध्ये कोपऱ्यात ठेवून दिली. मला ती अधून-मधून दिसत राहील आणि बळ देत राहील. किती तरी लोकांच्या आयुष्याला किंकर जींनी परीस-स्पर्श केला होता.... आणि उशीराच का होई ना आज त्यात अजून एक भर पडली होती.

  - जुई 


Tuesday, February 22, 2011

प्रचीती



जेंव्हा पांघरली जराशी, कृष्ण मेघांची दुलई...
गेली चटका देऊन, तप्त विजेची सळई

जेंव्हा टांगला जरासा, इंद्रधनुला हिंदोळा...
सूर्य अस्ताला कलला, धनुष्य मोडून गेला.

जेंव्हा माळले जरासे, शुभ्र गारांचे मोती...
आले ऊन कवडसे, माळ चोरून ते नेती.

जेंव्हा गुंफल्या जराश्या, चंचलश्या जलधारा...
गेला उनाड भरारा, गोफ उसवून वारा.

जेंव्हा झंकारली जरा, मनी मृदगंधाची धून...
कोसळत्या निनादात, गेली विरून.. वाहून...

पण, जेंव्हा खोचला जरासा, भाळी मोराचा पिसारा...
लाजली सृष्टी सारी, रंग उरला निळा... गहिरा...

___ जुई

सण ... 'आज कल'





           नेहेमी प्रमाणे ऑफिस मध्ये लॅपटॉपसमोर बसून काम करत होते... दसऱ्याचा दिवस... सुट्टी नाही.... कामात लक्ष लागेना. झेंडूची फुलं, आपट्याची पानं, श्रीखंडाचा घमघमाट आठवला... काय करावं सुचेना.... सरळ हाफ डे टाकून घरी जावं का ? पुष्कर ला सांगते.. आज लवकर ये घरी.. दसरा आहे. पण घरी जाऊन तरी काय करणार?  इथे झेंडूची फुलं कुठे मिळतील काय माहित ? आणि पानं वाटायला कोणाकडे जाणार ? आपण आपल्या सगळ्या शेजाऱ्यांना ही नीट ओळखत नाही... इथे आहोत तो पर्यंत हे असंच होणार का नेहेमी ?

२ महिन्यापूर्वीची गोष्ट...सकाळी ब्रेकफास्टची तयारी करत होते. ब्रेड स्लाईसेस टोस्टर मध्ये सरकवल्या आणि आज अंडं उकडावं की ऑम्लेट करावं या विचारात फ्रीज च्या दारापाशी उभी होते तेवढ्यात फोन वाजला... एवढ्या सकाळी फोन म्हणजे आईचाच असणार...
मी:  बोल ग आई   
आई: अगं लक्षात आहे ना...आज नागपंचमी आहे. तुला कदाचित लक्षात आलं नसेल म्हणून  मुद्दाम लवकर फोन केला. आज काही भाजायचं-चिरायचं नसतं बरंका...आणि हां..आता तुला तिथे  नाग कुठून दर्शन देणार म्हणा...पण नागाची रांगोळी किंवा चित्र काढ आणि त्याला नैवेद्य दाखव आठवणीनी...
मी: चित्रासमोर नैवेद्य वगैरे ठीक आहे..पण न भाजण्याचं आणि चिरण्याचं कसं जमेल ? ऑफिस ला जायच्या आत स्वयंपाक करून जायचंय ... आणि एक मिनिट.. टोस्टर मध्ये ब्रेड टाकलाय आत्ताच.. तो भाजण्याच्या कॅटेगरीमध्ये येतो का ग ? 
आई: अगं बाई.. ते नाही माहित. बर मग ते राहू देत... आज निदान फक्त काही मांसाहाराचं खाऊ नका...

नागपंचमीचा विचार करता करताच ऑफिस ला पोचले.. अर्रेच्चा .. म्हणजे श्रावण सुरु होऊन ५ दिवस झाले सुद्धा.. कळलंच नाही.... घरी असतो तर...? भरून आलेलं आभाळ, मातीचा सुंदर वास, कोवळ्या अंकुरांचा ताजा-तवाना पोपटी रंग.. हे सगळे ""श्रावण येणार असा निरोपच घेऊन येतात ! लहानपणीची नागपंचमी आठवली... हातावर मेंदी काढलेली असायची... घरात पुरण शिजवलेलं असायचं... एका वर्षी बाबांनी खास सर्पोद्यानात नेलं होतं...साप-नागांची खरी माहिती व्हावी म्हणून. 'गेले ते दिन गेले' म्हणत कामाला लागले...अनिता दिसली ऑन-लाइन ... माझी इथली एकुलती एक जवळची मराठी मैत्रीण. तिचा स्टेटस मेसेज होता: स्नेक-माराथोन --ऑसम फन. मला तिचे असे विचित्र स्टेटस मेसेजेस कधीच कळत नाहीत. असो...लगेच चॅट-विंडो उघडली. 
मी: हाय ! ऑफिस मध्ये आहेस का ? अगं ऐक ना.. आज नागपंचमी आहे...
अनिता: हो, माहितीये. म्हणून तर हा स्टेटस :)
मी: म्हणजे ?
अनिता: अगं.... सहज सर्च करत होते नागपंचमी विषयी.. तर या गेम ची लिंक  सापडली. स्नेक मॅरॅथॉन.खूप धमाल आहे.
मी: गेम खेळतीयेस ? काम नाही वाटत आज काही ? ;)
अनिता: आहे थोडसं... पण अगं हा टीम नि खेळायचा गेम आहे... तर आत्ता ब्रेक मध्ये माझ्या कलीग्स ना शिकवत होते... :) आपल्या टीम च्या सापाला शेवटपर्यंत लवकर पोचवायचं असतं... वाटेतल्या बीळांवर आणि फूड वर जो फास्ट क्लिक करू शकतो तो जिंकतो :)

नागपंचमी च्या दिवशी सापांना जिंकवण्याच्या नादात अचानक 'माऊस' ला प्राप्त झालेलं महत्त्वं बघून गम्मत वाटली! 

असा आयत्या वेळी एखादा सण आहे हे लक्षात येणं काही खरं नाही. पुढच्या वेळी पुण्याहून येताना नक्की कालनिर्णय घेऊन यायचं असा निश्चय केला. नाही तर खूप धावपळ उडते. गुढीपाडव्याला असंच झालं...सकाळी सकाळी 'अहो आईंचा' फोन. "" गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुम्हा दोघानाही ! पहिलाच पाडवा तुमचा. मग, उभारली का नाही गुढी ? झाली पळापळ सुरु... कपडे वाळत घालायची काठी सापडली. त्यावर घालायला सिल्क चा रुमाल ही सापडला.. पण आता त्यावर उपडा घालायला चांदीचा कलश कुठून आणायचा ? काचेचा ग्लास चालतो का ? आंब्याची पानं नाहीत आणि कडू-निंबाची ही नाहीत... साखरेच्या गाठी नाहीत. आता काय करायचं ? नंतर शेवटी आम्ही आपापल्या 'फेसबुक' च्या भिंतीवर गुढीचं चित्र उभारून आमचा पहिला पाडवा साजरा केला ! 

तसा पहिला सण होळी म्हटला पाहिजे. नवीनच लग्न होऊन आलो होतो इथे. खूप उत्साहात होळी साजरी करू असं ठरवलं. त्या निमित्तानी एक गेट-टुगेदर होईल. इथल्या काही मित्र-मैत्रीणीना बोलावलं. शेकोटी असेल असं सांगितल्यावर पहिलीच प्रतिक्रिया अशी आली होती की "" अच्छा, म्हणजे बारबीक्यू का? आम्ही कपाळाला हात लावला. 

लग्नाचं पाहिलं वर्ष म्हणून श्रावणातल्या मंगळागौरी चं महत्वही खूप होतं ! नेहेमीप्रमाणे
आई : ""तुझी पहिलीच ग मंगळागौर. इथे असतीस तर किती कौतुकानी साजरी  केली असती. पण तुम्ही आता बिझी मुली. थोड्या थोडक्या गोष्टींसाठी सुट्टी घेऊन येणही परवडण्या सारखं नाही. बर... ऐक, निदान या मंगळवारी पाच सवाष्ण बायकांना जेवायला घाल.  
मी सवाष्ण बायकांच्या शोधाला लागले. भारतीय नसल्या तरी लग्न झालेल्या म्हणजे सवाष्णच की असा विचार करून ऑफिस मधल्या पाच जणींबरोबर लंच चा प्लान केला. मॅनेजर असलेल्या मेरी चा निरोप आला की मंगळवारी मीटिंग आली आहे एक... बुधवारी जाऊ या लंच ला.आता हिला मंगळवार चं महत्व कसं समजावून सांगू ? शेवटी पुढच्या आठवड्यातल्या मंगळवारी प्लान ढकलून टाकला.तरी नंतर  हळदी-कुंकू न देताच कसं ग जेवायला घातलस? या प्रश्नाला मात्र मी उत्तर नाही देऊ शकले.

आई ला एक दिवस विचारलं होतं की एखादा सण वीकेंड ला नाही आलाय का ग? म्हणजे छान, निवांत करता येईल सगळं. थांब हां... बघते.... अगं, या वेळी राखी पौर्णिमा आलीये रविवारी  छान.... मी इथे. माझे सगळे भाऊ तिथे. रविवार असून काय उपयोग ?  यावर आई म्हणाली होती  बरं झालं बाई तुम्ही दिवाळी ला इथे येताय .. म्हणजे निदान एक तरी सण रीतसर होईल तुमचा !  

हे वाक्य मात्र विचार करायला लावणार होतं. म्हणजे मी इथे कितीही प्रयत्न केला, आमची कितीही त्रेधा उडली, आणि आमच्या परीने आम्ही कितीही सण साजरे केले तरी घरच्यांच्या लेखी 'धड एकही सण रीतसर नाही केला' असंच होईल का ? आपण तरी हे सगळं नक्की कशासाठी करतोय ? आई-बाबा आणि 'अहो-आई-बाबांसाठी ?  का आपल्या आनंदासाठी? प्रत्येक सणामागची भावना महत्वाची का तो साजरा करण्याची रीत? सगळेच करतात म्हणून आणि इतकी वर्षे आपणही करत आलो म्हणून एखादा सण त्याच ठराविक पद्धतीने साजरा करायचा.... मग त्यात खूप अडचणी आल्या आणि ते एक जिकिरीचं काम वाटायला लागलं तरी ? त्यातला आनंदच विरून गेला तरी ?
काही सण हे एखाद्या प्रदेशावर, तिथल्या हवामानावर आणि तिथल्या रूढी-परंपरांवर आधारलेले असतात. परदेशात किंवा नवीन जीवन-पद्धती मध्ये त्या सणाविषयीच्या काही गोष्टी विसंगत वाटू लागल्या तर त्या थोड्या बदलायला काय हरकत आहे ? आपली संस्कृती जपण्यासाठी प्रयत्नपूर्वक आपण आपले सण साजरे केले तरी ते जसेच्या तसे पूर्वीसारखेच  वाटतील असा हट्ट कसा ठेवता येईल ? थंडीचे दिवस असतात म्हणून आपण उष्ण प्रवृत्तीचा तीळ-गूळ संक्रांति ला वाटतो. पण कायमच उष्ण-दमट हवा असलेल्या सिंगापुरात चॉकलेट्स वाटून शेजाऱ्यांशी ओळखी वाढवल्या तर काय हरकत आहे ? वटपौर्णिमेला वडाचं झाड शोधून त्याला फेऱ्या मारण्यापेक्षा ४-५ नवीन झाडं लावली तर काय हरकत आहे ? (हवं तर जोडीने झाडं लावावीत म्हणजे त्या दिवशीचं नवऱ्याचं + झाडाचं महत्व साधलं जाईल ! ) रोजचीच झोपायची वेळ ११-१२ झाली असेल तर कोजागिरीच्या जागरणाचं वेगळेपण काय राहणार ? मग आपण जिथे राहतो तिथला मून फेस्टिवल हा आपल्या कोजागिरी साठीच आहे असं म्हणून हातात कंदील घेऊन, मून केकचा आस्वाद घेता घेता चंद्राच्या सौंदर्याच कौतुक केल तर काय हरकत आहे ?  पोष्टापेक्षा किती तरी पटींनी फास्ट असणाऱ्या इ-मेल द्वारा राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा आपल्या भावाला दिल्या किंवा त्याहीपेक्षा नवीन मध्यम वापरून त्या दिवशी व्हिडिओ-चॅट करून व्हर्च्युअल राखी बांधली तर काय हरकत आहे ? सगळे सण आपल्याला निसर्गाचं महत्व शिकवतात, मानवी नाती-गोती कशी जपावी हे शिकवतात, रोजच्या नियमित कामाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण घेऊन येतात, आप्तेष्टांच्या भेटी घडवतात. हे सगळं महत्वाचं असताना बरोबर पद्धत कोणती आणि चुकीची कोणती या वादात कशाला पडायचं ? 

तेवढ्यात फेसबुक च्या विंडो मध्ये नवीन मेसेज आला. ' Priya has shared Golden leaves with you, wishing you happiness and prosperity in your life! '  मी मनातल्या मनात हसले, तिलाही एक सुंदरसं इ-ग्रीटिंग पाठवून दिलं आणि आजच्या दिवस प्रोफाईल वर लावायला माझा एखादा साडीतला फोटो आहे का 
शोधायला लागले. :)

-जुई
(ऋतुगंध - शरद  (सिंगापूर) मध्ये पूर्व-प्रकाशित )