Thursday, December 31, 2020

स्वप्नपूर्ती

काळ्या सावळ्या अंबरात विखुरलेले मोती
खाली नक्षत्रांच्या प्रकाशाने भिजलेली रेती 

लाटांवर उमटलेले अगणित नीलमणी 
प्रकाशाच्या उ:शापाने उजळलेलं पाणी 

चंद्रास्ताच्या खूणा मोजत वितळणारं क्षितिज 
आठवणींच्या वेदनेने चमकून गेलेली वीज 

कवितेच्या ओळी ऐकत निश्चल उभी रात्र 
वार्‍याच्या अंधारओल्या मिठीत चिंब गात्रं 

आरोही लाटांनी चढणारी उदंड भरती 
तुझ्या नजरेतून हे बघणं हीच स्वप्नपूर्ती

- जुई 

Saturday, December 26, 2020

तू असा शेजारी

 
तू असा शेजारी गाढ झोपलेला.. 
श्वासांची संथ लय 
माझा हात तुझ्या छातीवर ठेवलेला 
तुझ्या हृदयाचे ठोके 
हाताला जाणवणारे 
निश्चित … आणि आश्वासक 

ते ठोके मी मोजत राहते 
त्यांच्या लयीवर माझ्या मनात उमटणारं 
संगीत ऐकत राहते 
ओळखीचं … आणि मोहक 

त्या संगीताच्या पार्श्वभूमीवर 
माझ्या दुसऱ्या हाताची बोटं 
तुझ्या मऊ केसातून फिरू लागतात 
त्यांचा स्पर्श माझ्या बोटातून 
मनापर्यंत पसरत जातो 
रेशमी …आणि सुखावणारा 

केसातून फिरणारी बोटं 
मग कानाच्या पाळीशी 
लडीवाळपणे खेळतात 
आणि गालावरून भुवईचं वळण घेऊन 
नाकाच्या सरळ रेषेत खाली येतात 
तिथे पुन्हा तुझ्या श्वासांचं संगीत जाणवतं 
धीमं… आणि संयत 

तुला कल्पना नाही 
पण केवळ तुझ्या झोपेतही 
माझ्या जाणीवा 
तू अश्या जिवंत करतोस 
आणि तुझ्या असण्यामुळे 
माझे श्‍वास होतात 
लयबद्ध .. आणि किती तरी समृद्ध! 

Thursday, December 24, 2020

मला कळतंय

 
घर-परंपरांच्या चौकटीत आल्यापासून सारखंच 
तुझं मन अडकलेल्या पाखरासारखं रडतंय 
मला कळतंय ...
पण चौकट मोडायचा धीर तुझा तुलाच शोधला पाहिजे 

मनापासून पाहिलेलं, हौसेने खुलवलेलं 
तुझं स्वप्न उंबऱ्याबाहेर जाण्यासाठी पळतंय 
मला कळतंय ...
पण स्वप्नासारखंच सत्यही तुला डोळे उघडून पाहिलं पाहिजे 

निराशेच्या अंधारात स्वतःशीच झुरताना 
डोळ्यामधून पाझरणारं पदरामागेच अडतंय 
मला कळतंय ...
पण आसवांना थांबवून आतल्या आवाजाला शोधलं पाहिजे 

नाती-गोती, रूढी-विधी यात सगळे गुंतले असता 
खिडकी बाहेरचं मुक्त जग खुणावून तुला छळतंय 
मला कळतंय ...
पण जुन्या डोळ्यांना नवीन दृष्टी द्यायला आता शिकलं पाहिजे 

धाक, आदर, प्रेम अश्या न तुटणाऱ्या बंधनातून 
बाहेर पडायच्या विचारांनी तुझं काळीज हलतंय 
मला कळतंय...
पण या हिमतीचं मोल जाणून तुला पाऊल उचललं पाहिजे 
     या हिमतीचं मोल जाणून तुला पाऊल उचललंच पाहिजे 

- जुई 

धक्का

 
एकमेकांना भेटायचा आग्रह कधी आपल्याला करावा लागला नाही 
ठरलेल्या ठिकाणी आपण दोघंही यायचो … 
तू माझ्याआधी म्हणजे वेळेत यायचास 
आणि मी तुझ्याआधी … म्हणजे वेळेत निघायचे 
दरम्यान नेहेमी मीच भरभरून बोलत राहायचे  
छोट्या मोठ्या गोष्टींचं पाल्हाळ लावत बसायचे 
तुला त्याचा कधीच कंटाळा यायचा नाही 

कधी मी खुशीत असले कि तू ही माझ्याबरोबर मन-मोकळं हसायचास 
कधी उदास असले तर शांतपणे हातावर आश्वासक हात ठेवायचास 
दंगा करणे, चिडवणे, चेष्टा करणे किंवा बिनधास्त मनात येईल ते सांगून टाकणे 
या सगळ्याची जबाबदारीसुद्धा माझ्यावरच असायची 
तू आपणहून फारसं कधी काही बोलायचा नाहीस 
आणि तुला बोलतं करून स्वतः शांतपणे ऐकावं असं मलाही कधी वाटायचं नाही 
मला वाटायचं कि तू मला पुरतं ओळखणारा, मला समजून घेणारा आहेस 
तशीच मी हि तुला ओळखून आहे. 
बहुदा मला ठाम विश्वासच होता 
कि, जर काही बोललास तर मला कळला असतास तेवढाच न बोलताही कळलाच आहेस 

आज सकाळी मात्र माझं बोलणं मध्येच तोडून तू मला अचानक विचारलंस की "आता असं ठरवून, तास- दोन तास उशिरा येउन, घाईघाईत भेटून, अशी नॉन stop बडबड करून घड्याळाच्या धाकानी मधेच निघून जाण्यापेक्षा … 
निवांतपणे घरीच का येत नाहीस ? कायमची ? मग आरामात बसून रोज माझं डोकं खा …. कसं?"
डोळे मिचकावून हसलास आणि 'विचार करून सांग मला' असं म्हणून 
मला तिथेच एकटीला, गोंधळलेल्या अवस्थेत सोडून, वेळेत… म्हणजे माझ्या आधी निघून गेलास 
तू इतक्या साळसूद पणे मला असं काही इतक्यात विचारशील असं वाटलंच नव्हतं. 

तुझ्या त्या नितळ डोळ्यांमागे अश्या अदृश्य खट्याळ गुहा असतील अशी शंकाही कधी आली नव्हती
तुला मी पुरतं ओळखलं आहे ह्या माझ्या विश्वासाला असा धक्का बसला असला तरी 
त्या धक्क्यामुळे मी तुझ्या प्रेमात अजूनच जोरात पडले असं वाटतंय 
आता पडल्यामुळे झालेल्या जखमा तूच भरून काढू शकतोस म्हणून मला तुझ्या घरी यावंच लागणार !!

- जुई 

असं म्हणू हवं तर...

 


त्या वयाचाच तो दोष होता…  म्हणू हवं तर 

भेटता क्षणी खेचले गेलो एकमेकांकडे 
कारणं काढत, ओळखी वाढवत जवळ येत गेलो 
एकमेकांसोबत मनाचे रंगीत पिसारे फुलवत गेलो 
त्या वेळी दाटून आलेल्या मल्हार-मेघांचाच दोष होता …  म्हणू हवं तर 

माझ्या वादळी आणि तुझ्या नितळ स्वभावात 
गुंतत गेलो, जोखत गेलो एकमेकांचं पाणी 
झंझावातासारखा मी सैरभैर झालेलो असताना 
शांत सरोवरासारख्या तुझ्या मिठीत माझे सारे आकांत भिडले  
त्या पहिल्या स्पर्शी रक्तात सळसळून गेलेल्या विजेचाच दोष होता..  
असं म्हणू हवं तर 

आणि मग जेंव्हा घेतल्या आणा - भाका - वचने 
चढ-उतारात हात धरायचे, जुळवून ठेवायची मने 
मावळणारा सूर्यही साक्षीला हजर राहताना रेंगाळला होता  
त्या संध्यासमयीचाच दोष होता…  म्हणू हवं तर 

पण उशिराने का होई ना, आता तरी कबूल करायला हवा 
टोचणारा, डाचणारा, छळणारा असला तरी आता स्वीकारायला तर हवा 
आपल्याच बाबतीत का घडला आणि म्हणून न्याय्य नसला तरी मान्यही व्हायला हवा 

एके काळी बसलेल्या घट्ट गाठी हळू हळू सैल पडून सुटतात 
खळाळणाऱ्या नद्या सुद्धा रोडावत जाऊन कधी तरी अदृश्य होतात 
पानं गळतात, फुलं सुकतात, पाखरांच्या वाटा चुकतात 
काही प्रश्नांची उत्तरं असतात काहींची नसतात 

कोणता बोल टोचला, कोणता अबोला खुपला 
माझी वाट बदलत गेली कि तुझाच हात सुटला 
माझ्या वादळामुळे खेळ तुटला कि तुझ्या थंड उदासीनतेने गोठला 
या गुंत्यात अडकून आता पुढचा प्रवास अवघड करण्यापेक्षा 
जेंव्हा सूर जुळलेत असं भासलं होतं त्या गाण्याचाच दोष होता…  म्हणू हवं तर 
किंवा त्या वयाचाच तो दोष होता … असं म्हणू हवं तर 

- जुई 

Thursday, September 18, 2014

अपेक्षा

अपेक्षा 

जगाच्या आपल्याकडून 

काही स्वतःच्या स्वतःकडून … 


म्हणजे तसा जर सुटा सुटा विचार केला तर....

मला आवडेल मी खूप प्रसिद्ध झाले तर

मला आवडेल माझं फर्स्ट क्लास करिअर झालं तर

मला आवडेल मी एखाद्या कलेत प्रभुत्व मिळवलं तर

मला आवडेल मी प्रेमळ, गुणी बायको झाले तर

मला आवडेल मी झकास स्वयंपाक करणारी सुगरण झाले तर

मला आवडेल मी आदर्श आई झाले तर

असं बरंच काही मला आवडेल...


पण हे सगळं रोजच्या रोज मला आवडेल ? जमेल ? 


कारण खरं तर मला व्हायचंच नाहीये सुपर वूमन 

I am happy being human...

- Jui

Sunday, August 4, 2013

आनंदाचं बीज

इमारतीत नवीन बिऱ्हाड नुकतंच आलं होतं... सगळ्यात वरच्या मजल्यावर. तसे चारच मजले होते पण लिफ्ट नसल्यामुळे चार मजले चढून जाण सगळ्यांच्याच जीवावर यायचं. नवीन येणाऱ्या बिऱ्हाडात मध्यम वयीन नवरा-बायको, त्यांचा तरुण कमावता मुलगा आणि कॉलेजमध्ये शिकत असलेली मुलगी होती. सामानाचा टेम्पो खाली उभा होता. पलंग, कपाट वगैरे वस्तू जिन्याचे कोन-कोपरे सांभाळून वर चढवणं चालू होतं. मुलगी या सामानाच्या स्थलांतराकडे लक्ष देत होती. आम्ही तळ-मजल्यावर राहत असल्यामुळे आमच्या दारावरूनच सगळी ये-जा चाललेली... मी त्या वेळी ७-८ वर्षांची असेन. मी शाळेचा गृहपाठ करत बसले होते आणि आई वर-वरची कामं करत होती. काही वेळानी दार वाजवून ती आत आली. "काकू थोडं पाणी देता का? फारच धाव-पळ चाललीये ना...   काही कागद-पत्रांच्या कामासाठी दादा आणि बाबा बाहेर गेलेत, आई वरती घरात आणि मी पण वर गेले तर सामानाकडे कोण बघणार? पण आता उन्हात थांबून फारच तहान-तहान होतंय म्हणून म्हटलं तुम्हालाच पाणी मागावं.  आणि मी अजून ओळख नाही ना करून दिली? मी शर्मिला. शर्मिला पाटील. आम्ही इथे वर राहायला आलोय. आमचं आधीच घर फारच लांब होतं. मला कॉलेजला आणि शशांक दादाला त्याच्या ऑफिसला जायला खूपच गैरसोयीचं होतं. इथे एकदम मोक्याच्या जागी आता आलोय तर खूप छान वाटतंय. काकू पाणी मस्त गार आहे ... माठातलं आहे का? वाळ्याचा वास येतोय छान. एका जग मध्ये अजून देता का? सामान चढवून हे लोक पण दमले असतील.. त्यांना देऊन येते." आईला काही बोलायची संधीही न देता धांदलीत बाहेर गेली. ती आमची शम्मी-ताईशी झालेली पाहिली भेट. दिसायला चार-चौघींसारखी, उंचीला बेताची, रंग सावळा पण एकदम लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे मोत्यासारखे दात आणि निखळ हास्य... जे बघून आपल्याही चेहऱ्यावर अनाहूतपणे स्मित तरळून जावं.

नंतर पाण्याचा जग परत द्यायला आली आणि तासभर गप्पा मारत बसली. माझ्याशी पण शाळेतल्या गमती सांग, एखादा बैठा खेळ शिकव किंवा मैत्रिणींची नावं विचार... वगैरे बोलत होती. माझा छोटा भाऊ २ वर्षाचा होता. तो दुपारची झोप संपवून उठल्यावर तर त्याला सोडेच ना... " काकू, मला ना लहान मुलं फार आवडतात. जुन्या घराच्या जवळ पण एक छोटी मुलगी रहायची .. मी तिला रोज घरी खेळायला घेऊन यायचे. ह्याला पण अधून मधून खेळायला घेऊन गेले तर चालेल का? फारच गोड आहे हा. इथे याच इमारतीत आणखी लहान मुलं पण आहेत का? मगाशी खेळताना दिसली होती बाहेर. व्वा.... मजा येणार या घरात. अजून आम्ही सामान लावतोय पण मला आत्ताच आमचं हे नवीन घर फार आवडायला लागलंय. "

 
आणि मग बघता बघता शम्मी ताई अगदी घरचीच होऊन गेली... रोज १-२ वेळा तरी चक्कर असे. सकाळी लवकर कधी आली तर म्हणे " छोटूचा एक शिळा पापा घेऊन जाते... मग त्याची अंघोळ झाली कि ताजा पापा घ्यायला पुन्हा येईन." उत्साह मावळलेला कधी दिसायचाच नाही. दिवसभर कॉलेजमध्ये जाऊन आली तरी संध्याकाळी, रात्री अगदी तरतरीत... आमच्याशी दंगा करायला तयार. माझ्या भावाला काही तिचं शर्मिला हे नाव म्हणता यायचं नाही म्हणून तो तिला शम्मी ताई म्हणायचा आणि तेंव्हापासून ती सगळ्यांचीच शम्मी ताई झाली होती.  इमारतीतल्या सगळ्या लहान मुलांनाही चटकन तिचा लळा लागून गेला. सुट्टीच्या दिवशी पत्ते खेळायचा बेत आखला कि शम्मी ताई त्यात आहेच... दिवाळीचा किल्ला करायला शम्मी ताईची धावपळ सुरु... रविवारी सगळ्यांना घेऊन टेकडी किंवा पर्वतीवर घेऊन जायला शम्मी ताई तयार... गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवणे, बाल-नाट्याला घेऊन जाणे या पण तिच्या आवडीच्या गोष्टी.

तिची आई कधी कधी माझ्या आईशी गप्पा मारताना कौतुक मिश्रित तक्रार करे ' बघा हो.. एवढी मोठी झाली तरी हूडपणा काही जात नाही अंगातून. आता लहान पोर का आहे? पण रमतेच फार लहान मुलांत. जीव लावून असतात लहानगेही ... म्हणून काही म्हणवत नाही. तसं काहीच वाईट करत नाही पण कधी तरी मोठं व्हावंच लागेल न.. किती दिवस खेळत बसता येणार आहे असं? " तिच्या आईचं बोलणं तेंव्हा कानावर पडलं तरी समजलं नव्हतं. पण जेंव्हा शम्मी ताईचं लग्न ठरलं तेंव्हा आता ती सोडून लांब जाणार याची जाणीव झाली. शम्मी ताई लग्न होऊन औरंगाबादला निघून गेल्यावर बरेच दिवस कोणालाच करमले नाही. सारखीच तिची आठवण येत होती. पण हळूहळू सगळे आपापल्या व्यापात गुंतले. अधून मधून विषय निघत राहिला पण सगळ्यांनी तिचं नसणं स्वीकारलं होतं. लहानग्यांना जास्त दिवस तिची कमी जाणवत राहिली एवढंच. एखाद्या वर्षात तिच्या घरचेही दुसरीकडे राहायला गेले आणि शम्मी ताई कधी माहेरी आली कि भेटेल याही शक्यतेला पूर्णविराम मिळाला. 

त्या नंतर खूपच म्हणजे ९-१० वर्षांनी एका दुपारी दारात शम्मी ताई हजर !! केसांत १-२ रुपेरी तारा, सराईतपणे चापून नेसलेली साडी आणि चष्मा सोडल्यास बाकी काहीही फरक नाही. तेच निखळ हसू चेहऱ्यावर आणि आनंदाचा झरा डोळ्यात. सगळ्यांना अगदी घट्ट भेटली आणि नेहेमीसारखी तिने बोलायला सुरुवात केल्यावर आम्हाला काही म्हणायची संधीही दिली नाही. आई बाबांची चौकशी केली, मी किती मोठी झालीये यावर आश्चर्य दाखवलं शेजारच्या काकुंविषयी विचारलं. आता ती रहायची त्या घरात कोण राहतंय विचारलं...आणि माझ्या छोट्या भावाला भेटायला आतूर झाली. पण आईनी तिला जरा शांत केलं .. म्हणाली 'अगं, तू जराही बदलली नाहीस. जरा दम धरशील कि नाही? तो येईल क्लासहून एवढ्यात पण अगं तू इथे राहायचीस तेंव्हा तो फारच लहान होता... २-३ वर्षांचा. एवढ्या लहान वयातलं नाही आठवत कधी कधी ... तर तू काही मनाला लावून घेऊ नकोस जर त्याने पटकन ओळखलं नाही तर. तसं होणं साहजिक आहे म्हणून सांगितलं ... तू आता बस जरा आणि तुझ्याविषयी तर सांग. कशी आहेस? कुठे.. औरंगाबादलाच असतेस का? घरचे कसे आहेत? " आईचं बोलणं ऐकून शम्मी ताईच्या चेहऱ्यावर एक अनामिक भाव तरळून गेला जो बघून तेवढ्या क्षणापुरती हि आपली शम्मी ताई नाहीच. कोणी वेगळीच शहाणी, विवेकी, मोठी बाई आहे असं वाटून गेलं. जोराची सर येऊन गेल्यावर जसा नंतरचा पाऊस समाधानी बरसत राहतो तशी ती आता वाटायला लागली. आम्हाला एवढ्या वर्षांनी भेटून झालेला आनंदाचा पहिला जोर कमी झाला आणि आरामशीर बसून ती बोलायला लागली.
" काकू, किती वर्ष झाली न आपल्याला भेटून. लग्नाआधीचं जग एकदम वेगळंच असतं ना? फार जुन्या, स्वप्नासारख्या वाटतात मला त्या गोष्टी. मी लग्न होऊन गेले न सासरी तेंव्हा एवढी भीती वाटत होती कि कसे असतील लोक, नवरा समजून घेईल कि नाही? नवीन घर, नवीन शहर... डोळ्यासमोर एकही ओळखीचं माणूस नाही. पण खरं सांगू.. हि सगळी भीती अनाठाई होती. खूपच प्रेमळ लोक आहेत हो सगळे. आणि मोठ्या दिरांची एक छोटुकली पण होती ना घरी. मग तर काय आमची गट्टीच जमली होती. काही महिन्यात दीर पुण्याला आले नोकरी-निमित्त आणि मग घरी मला करमेना. आम्ही तेंव्हा मग घरात आपलं छोटं कुणी आणावं असं ठरवलं पण कसं असतं बघा. मला मुलांची एवढी हौस पण एका तपासणीतून कळलं कि मला कधी मूल नाही होऊ शकणार. मी अगदी तुटून गेले हे ऐकल्यावर. दुसऱ्या घरच्या कुणी मलाच बोल लावले असते पण घरच्यांनी समजून घेतलं. अडचण हीच होती कि मीच ही गोष्ट पचवू शकत नव्हते. आधी स्वतःला, नवऱ्याला... मग नशिबाला, देवाला.. सगळ्यांना दोष देऊन झाला... मनाची खिन्नता कित्येक दिवस गेली नाही. उदासपणे घरात या खोलीतून त्या  खोलीत हिंडत राहायचे. काहीच करायला उत्साह वाटायचा नाही. सगळ्या गोष्टी निरर्थक वाटू लागल्या. पण माझ्या नवऱ्याने खूप साथ दिली. मला हि गोष्ट किती लागलीये हे तो समजून होता. त्यानेच मग मला दत्तक मूल घेण्याविषयी सुचवलं. आम्ही एका अनाथाश्रमाला भेट दिली आणि तिथे गेल्यावर मला एकदम जाणवलं कि माझी आणि या किंवा अश्या मुलांची जोडी खरं तर उत्तम आहे. त्यांना प्रेम करणारं, जपणारं कोणी हवं आहे आणि मला माझ्या प्रेमाचा घडा कोणावर तरी रिता करायची इच्छा आहे. आणि मग एकानंतर एक गोष्टी घडत गेल्या आणि एखादं मूल दत्तक घेण्याऐवजी आम्ही एक अनाथाश्रमच दत्तक घेतलं असं म्हणूया. सुदैवाने सुरुवातीला पदरचे घालून आणि नंतर मिळालेल्या देणग्यांच्या, ट्रस्टच्या मदतीनी उत्तम चालू आहे. मला कोणी विचारलं कि तुम्हाला किती मुलं -बाळ ? तर मी म्हणते सध्या ३५ आहेत पण कदाचित पुढच्या महिन्यात २-३ अजून होतील! आम्ही अनाथाश्रम असं नाही म्हणत तर प्रेमालय असं नाव दिलंय संस्थेला. त्याच संदर्भात एका कामासाठी इथे जवळ आले होते म्हणून म्हटलं भेटून जावं "
आम्ही सगळे हे ऐकून स्तब्ध झालो होतो. आईला तिचा खूप अभिमान वाटला, कौतुक वाटलं. काय बोलू आणि काय नाही असं तिला झालं होतं तेवढ्यात माझा भाऊ क्लासहून आला आणि त्यानी शम्मी ताईला ओळखलंही... तेंव्हा असं वाटून गेलंच कि कुणी ओळखलं नाही हे मनाला लावून घेण्याच्या पार गेली आहे ही. एखाद्या दुःखाचा डाग जपून ठेवण्याऐवजी त्याच्या कोंदणात नवीन आनंदाचं बीज कसं फुलवावं हे हिच्याकडून शिकलं पाहिजे. मी तिच्याकडे वेगळ्याच भारलेल्या नजरेनी बघत होते आणि ती आपली हे सांगण्यात गुंतली होती कि तिच्या मुलांपैकी एक अगदी माझ्या भावासारखा दिसतो आणि फक्त तो तिला कसं शम्मी-आई म्हणतो!