Showing posts with label कल्पनाविश्व. Show all posts
Showing posts with label कल्पनाविश्व. Show all posts

Thursday, December 24, 2020

असं म्हणू हवं तर...

 


त्या वयाचाच तो दोष होता…  म्हणू हवं तर 

भेटता क्षणी खेचले गेलो एकमेकांकडे 
कारणं काढत, ओळखी वाढवत जवळ येत गेलो 
एकमेकांसोबत मनाचे रंगीत पिसारे फुलवत गेलो 
त्या वेळी दाटून आलेल्या मल्हार-मेघांचाच दोष होता …  म्हणू हवं तर 

माझ्या वादळी आणि तुझ्या नितळ स्वभावात 
गुंतत गेलो, जोखत गेलो एकमेकांचं पाणी 
झंझावातासारखा मी सैरभैर झालेलो असताना 
शांत सरोवरासारख्या तुझ्या मिठीत माझे सारे आकांत भिडले  
त्या पहिल्या स्पर्शी रक्तात सळसळून गेलेल्या विजेचाच दोष होता..  
असं म्हणू हवं तर 

आणि मग जेंव्हा घेतल्या आणा - भाका - वचने 
चढ-उतारात हात धरायचे, जुळवून ठेवायची मने 
मावळणारा सूर्यही साक्षीला हजर राहताना रेंगाळला होता  
त्या संध्यासमयीचाच दोष होता…  म्हणू हवं तर 

पण उशिराने का होई ना, आता तरी कबूल करायला हवा 
टोचणारा, डाचणारा, छळणारा असला तरी आता स्वीकारायला तर हवा 
आपल्याच बाबतीत का घडला आणि म्हणून न्याय्य नसला तरी मान्यही व्हायला हवा 

एके काळी बसलेल्या घट्ट गाठी हळू हळू सैल पडून सुटतात 
खळाळणाऱ्या नद्या सुद्धा रोडावत जाऊन कधी तरी अदृश्य होतात 
पानं गळतात, फुलं सुकतात, पाखरांच्या वाटा चुकतात 
काही प्रश्नांची उत्तरं असतात काहींची नसतात 

कोणता बोल टोचला, कोणता अबोला खुपला 
माझी वाट बदलत गेली कि तुझाच हात सुटला 
माझ्या वादळामुळे खेळ तुटला कि तुझ्या थंड उदासीनतेने गोठला 
या गुंत्यात अडकून आता पुढचा प्रवास अवघड करण्यापेक्षा 
जेंव्हा सूर जुळलेत असं भासलं होतं त्या गाण्याचाच दोष होता…  म्हणू हवं तर 
किंवा त्या वयाचाच तो दोष होता … असं म्हणू हवं तर 

- जुई 

Sunday, August 4, 2013

आनंदाचं बीज

इमारतीत नवीन बिऱ्हाड नुकतंच आलं होतं... सगळ्यात वरच्या मजल्यावर. तसे चारच मजले होते पण लिफ्ट नसल्यामुळे चार मजले चढून जाण सगळ्यांच्याच जीवावर यायचं. नवीन येणाऱ्या बिऱ्हाडात मध्यम वयीन नवरा-बायको, त्यांचा तरुण कमावता मुलगा आणि कॉलेजमध्ये शिकत असलेली मुलगी होती. सामानाचा टेम्पो खाली उभा होता. पलंग, कपाट वगैरे वस्तू जिन्याचे कोन-कोपरे सांभाळून वर चढवणं चालू होतं. मुलगी या सामानाच्या स्थलांतराकडे लक्ष देत होती. आम्ही तळ-मजल्यावर राहत असल्यामुळे आमच्या दारावरूनच सगळी ये-जा चाललेली... मी त्या वेळी ७-८ वर्षांची असेन. मी शाळेचा गृहपाठ करत बसले होते आणि आई वर-वरची कामं करत होती. काही वेळानी दार वाजवून ती आत आली. "काकू थोडं पाणी देता का? फारच धाव-पळ चाललीये ना...   काही कागद-पत्रांच्या कामासाठी दादा आणि बाबा बाहेर गेलेत, आई वरती घरात आणि मी पण वर गेले तर सामानाकडे कोण बघणार? पण आता उन्हात थांबून फारच तहान-तहान होतंय म्हणून म्हटलं तुम्हालाच पाणी मागावं.  आणि मी अजून ओळख नाही ना करून दिली? मी शर्मिला. शर्मिला पाटील. आम्ही इथे वर राहायला आलोय. आमचं आधीच घर फारच लांब होतं. मला कॉलेजला आणि शशांक दादाला त्याच्या ऑफिसला जायला खूपच गैरसोयीचं होतं. इथे एकदम मोक्याच्या जागी आता आलोय तर खूप छान वाटतंय. काकू पाणी मस्त गार आहे ... माठातलं आहे का? वाळ्याचा वास येतोय छान. एका जग मध्ये अजून देता का? सामान चढवून हे लोक पण दमले असतील.. त्यांना देऊन येते." आईला काही बोलायची संधीही न देता धांदलीत बाहेर गेली. ती आमची शम्मी-ताईशी झालेली पाहिली भेट. दिसायला चार-चौघींसारखी, उंचीला बेताची, रंग सावळा पण एकदम लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे मोत्यासारखे दात आणि निखळ हास्य... जे बघून आपल्याही चेहऱ्यावर अनाहूतपणे स्मित तरळून जावं.

नंतर पाण्याचा जग परत द्यायला आली आणि तासभर गप्पा मारत बसली. माझ्याशी पण शाळेतल्या गमती सांग, एखादा बैठा खेळ शिकव किंवा मैत्रिणींची नावं विचार... वगैरे बोलत होती. माझा छोटा भाऊ २ वर्षाचा होता. तो दुपारची झोप संपवून उठल्यावर तर त्याला सोडेच ना... " काकू, मला ना लहान मुलं फार आवडतात. जुन्या घराच्या जवळ पण एक छोटी मुलगी रहायची .. मी तिला रोज घरी खेळायला घेऊन यायचे. ह्याला पण अधून मधून खेळायला घेऊन गेले तर चालेल का? फारच गोड आहे हा. इथे याच इमारतीत आणखी लहान मुलं पण आहेत का? मगाशी खेळताना दिसली होती बाहेर. व्वा.... मजा येणार या घरात. अजून आम्ही सामान लावतोय पण मला आत्ताच आमचं हे नवीन घर फार आवडायला लागलंय. "

 
आणि मग बघता बघता शम्मी ताई अगदी घरचीच होऊन गेली... रोज १-२ वेळा तरी चक्कर असे. सकाळी लवकर कधी आली तर म्हणे " छोटूचा एक शिळा पापा घेऊन जाते... मग त्याची अंघोळ झाली कि ताजा पापा घ्यायला पुन्हा येईन." उत्साह मावळलेला कधी दिसायचाच नाही. दिवसभर कॉलेजमध्ये जाऊन आली तरी संध्याकाळी, रात्री अगदी तरतरीत... आमच्याशी दंगा करायला तयार. माझ्या भावाला काही तिचं शर्मिला हे नाव म्हणता यायचं नाही म्हणून तो तिला शम्मी ताई म्हणायचा आणि तेंव्हापासून ती सगळ्यांचीच शम्मी ताई झाली होती.  इमारतीतल्या सगळ्या लहान मुलांनाही चटकन तिचा लळा लागून गेला. सुट्टीच्या दिवशी पत्ते खेळायचा बेत आखला कि शम्मी ताई त्यात आहेच... दिवाळीचा किल्ला करायला शम्मी ताईची धावपळ सुरु... रविवारी सगळ्यांना घेऊन टेकडी किंवा पर्वतीवर घेऊन जायला शम्मी ताई तयार... गोष्टीची पुस्तकं वाचून दाखवणे, बाल-नाट्याला घेऊन जाणे या पण तिच्या आवडीच्या गोष्टी.

तिची आई कधी कधी माझ्या आईशी गप्पा मारताना कौतुक मिश्रित तक्रार करे ' बघा हो.. एवढी मोठी झाली तरी हूडपणा काही जात नाही अंगातून. आता लहान पोर का आहे? पण रमतेच फार लहान मुलांत. जीव लावून असतात लहानगेही ... म्हणून काही म्हणवत नाही. तसं काहीच वाईट करत नाही पण कधी तरी मोठं व्हावंच लागेल न.. किती दिवस खेळत बसता येणार आहे असं? " तिच्या आईचं बोलणं तेंव्हा कानावर पडलं तरी समजलं नव्हतं. पण जेंव्हा शम्मी ताईचं लग्न ठरलं तेंव्हा आता ती सोडून लांब जाणार याची जाणीव झाली. शम्मी ताई लग्न होऊन औरंगाबादला निघून गेल्यावर बरेच दिवस कोणालाच करमले नाही. सारखीच तिची आठवण येत होती. पण हळूहळू सगळे आपापल्या व्यापात गुंतले. अधून मधून विषय निघत राहिला पण सगळ्यांनी तिचं नसणं स्वीकारलं होतं. लहानग्यांना जास्त दिवस तिची कमी जाणवत राहिली एवढंच. एखाद्या वर्षात तिच्या घरचेही दुसरीकडे राहायला गेले आणि शम्मी ताई कधी माहेरी आली कि भेटेल याही शक्यतेला पूर्णविराम मिळाला. 

त्या नंतर खूपच म्हणजे ९-१० वर्षांनी एका दुपारी दारात शम्मी ताई हजर !! केसांत १-२ रुपेरी तारा, सराईतपणे चापून नेसलेली साडी आणि चष्मा सोडल्यास बाकी काहीही फरक नाही. तेच निखळ हसू चेहऱ्यावर आणि आनंदाचा झरा डोळ्यात. सगळ्यांना अगदी घट्ट भेटली आणि नेहेमीसारखी तिने बोलायला सुरुवात केल्यावर आम्हाला काही म्हणायची संधीही दिली नाही. आई बाबांची चौकशी केली, मी किती मोठी झालीये यावर आश्चर्य दाखवलं शेजारच्या काकुंविषयी विचारलं. आता ती रहायची त्या घरात कोण राहतंय विचारलं...आणि माझ्या छोट्या भावाला भेटायला आतूर झाली. पण आईनी तिला जरा शांत केलं .. म्हणाली 'अगं, तू जराही बदलली नाहीस. जरा दम धरशील कि नाही? तो येईल क्लासहून एवढ्यात पण अगं तू इथे राहायचीस तेंव्हा तो फारच लहान होता... २-३ वर्षांचा. एवढ्या लहान वयातलं नाही आठवत कधी कधी ... तर तू काही मनाला लावून घेऊ नकोस जर त्याने पटकन ओळखलं नाही तर. तसं होणं साहजिक आहे म्हणून सांगितलं ... तू आता बस जरा आणि तुझ्याविषयी तर सांग. कशी आहेस? कुठे.. औरंगाबादलाच असतेस का? घरचे कसे आहेत? " आईचं बोलणं ऐकून शम्मी ताईच्या चेहऱ्यावर एक अनामिक भाव तरळून गेला जो बघून तेवढ्या क्षणापुरती हि आपली शम्मी ताई नाहीच. कोणी वेगळीच शहाणी, विवेकी, मोठी बाई आहे असं वाटून गेलं. जोराची सर येऊन गेल्यावर जसा नंतरचा पाऊस समाधानी बरसत राहतो तशी ती आता वाटायला लागली. आम्हाला एवढ्या वर्षांनी भेटून झालेला आनंदाचा पहिला जोर कमी झाला आणि आरामशीर बसून ती बोलायला लागली.
" काकू, किती वर्ष झाली न आपल्याला भेटून. लग्नाआधीचं जग एकदम वेगळंच असतं ना? फार जुन्या, स्वप्नासारख्या वाटतात मला त्या गोष्टी. मी लग्न होऊन गेले न सासरी तेंव्हा एवढी भीती वाटत होती कि कसे असतील लोक, नवरा समजून घेईल कि नाही? नवीन घर, नवीन शहर... डोळ्यासमोर एकही ओळखीचं माणूस नाही. पण खरं सांगू.. हि सगळी भीती अनाठाई होती. खूपच प्रेमळ लोक आहेत हो सगळे. आणि मोठ्या दिरांची एक छोटुकली पण होती ना घरी. मग तर काय आमची गट्टीच जमली होती. काही महिन्यात दीर पुण्याला आले नोकरी-निमित्त आणि मग घरी मला करमेना. आम्ही तेंव्हा मग घरात आपलं छोटं कुणी आणावं असं ठरवलं पण कसं असतं बघा. मला मुलांची एवढी हौस पण एका तपासणीतून कळलं कि मला कधी मूल नाही होऊ शकणार. मी अगदी तुटून गेले हे ऐकल्यावर. दुसऱ्या घरच्या कुणी मलाच बोल लावले असते पण घरच्यांनी समजून घेतलं. अडचण हीच होती कि मीच ही गोष्ट पचवू शकत नव्हते. आधी स्वतःला, नवऱ्याला... मग नशिबाला, देवाला.. सगळ्यांना दोष देऊन झाला... मनाची खिन्नता कित्येक दिवस गेली नाही. उदासपणे घरात या खोलीतून त्या  खोलीत हिंडत राहायचे. काहीच करायला उत्साह वाटायचा नाही. सगळ्या गोष्टी निरर्थक वाटू लागल्या. पण माझ्या नवऱ्याने खूप साथ दिली. मला हि गोष्ट किती लागलीये हे तो समजून होता. त्यानेच मग मला दत्तक मूल घेण्याविषयी सुचवलं. आम्ही एका अनाथाश्रमाला भेट दिली आणि तिथे गेल्यावर मला एकदम जाणवलं कि माझी आणि या किंवा अश्या मुलांची जोडी खरं तर उत्तम आहे. त्यांना प्रेम करणारं, जपणारं कोणी हवं आहे आणि मला माझ्या प्रेमाचा घडा कोणावर तरी रिता करायची इच्छा आहे. आणि मग एकानंतर एक गोष्टी घडत गेल्या आणि एखादं मूल दत्तक घेण्याऐवजी आम्ही एक अनाथाश्रमच दत्तक घेतलं असं म्हणूया. सुदैवाने सुरुवातीला पदरचे घालून आणि नंतर मिळालेल्या देणग्यांच्या, ट्रस्टच्या मदतीनी उत्तम चालू आहे. मला कोणी विचारलं कि तुम्हाला किती मुलं -बाळ ? तर मी म्हणते सध्या ३५ आहेत पण कदाचित पुढच्या महिन्यात २-३ अजून होतील! आम्ही अनाथाश्रम असं नाही म्हणत तर प्रेमालय असं नाव दिलंय संस्थेला. त्याच संदर्भात एका कामासाठी इथे जवळ आले होते म्हणून म्हटलं भेटून जावं "
आम्ही सगळे हे ऐकून स्तब्ध झालो होतो. आईला तिचा खूप अभिमान वाटला, कौतुक वाटलं. काय बोलू आणि काय नाही असं तिला झालं होतं तेवढ्यात माझा भाऊ क्लासहून आला आणि त्यानी शम्मी ताईला ओळखलंही... तेंव्हा असं वाटून गेलंच कि कुणी ओळखलं नाही हे मनाला लावून घेण्याच्या पार गेली आहे ही. एखाद्या दुःखाचा डाग जपून ठेवण्याऐवजी त्याच्या कोंदणात नवीन आनंदाचं बीज कसं फुलवावं हे हिच्याकडून शिकलं पाहिजे. मी तिच्याकडे वेगळ्याच भारलेल्या नजरेनी बघत होते आणि ती आपली हे सांगण्यात गुंतली होती कि तिच्या मुलांपैकी एक अगदी माझ्या भावासारखा दिसतो आणि फक्त तो तिला कसं शम्मी-आई म्हणतो! 

Monday, January 30, 2012

एकेका लग्नाची गोष्ट !


लग्न मंडप सजला आहे. फुलांच्या माळा सगळीकडे सोडलेल्या आहेत. मुहूर्ताची वेळ यायला अजून थोडा अवकाश आहे. जवळ जवळ ४००-४५० आप्त-स्वकीय-मित्र मंडळींनी सभागृह फुलले आहे... भरजरी, सोनसळी भपक्याने नटले आहे. एकीकडे जेवणाच्या हॉलमध्ये नंतरच्या भोजनाची तयारी जोरात चालू आहे. बाहेर वधु-वरांना घेऊन जाण्यासाठीची गाडीही दिमाखाने सजली आहे. रुखवतावर उंची वस्तू, कलाकृती वगैरे कलात्मक रित्या मांडून ठेवल्या आहेत. वधूपिता सगळी व्यवस्था चोख होते आहे ना हे बघण्यात मग्न आहेत. नवरा मुलगा - परदेशस्थ, हुशार, देखणा.. मित्र मंडळींच्या गरड्यामध्ये वेढलेला आहे. इकडे करवल्या विचार विनिमय करताहेत ... नवऱ्या-मुलाचे बूट कसे पळवता येतील या विषयी. वरमाई कौतुकाने सगळीकडे मिरवते आहे आणि वधूची आई हलल्या काळजानी पुढच्या विधीच्या तयारीला लागली आहे. 

या सगळ्या धामधुमीत, सभागृहात मांडलेल्या खुर्च्यांच्या दुसऱ्या रांगेत वधूचे आज्जी-आजोबा बसले आहेत. खरं म्हणजे इतर सगळ्या गोंधळामध्ये त्यांची उठ-बस नको म्हणून त्यांना तिथे बसवले गेले आहे. आज्जींच्या मनात चाळवा -चाळव चालू झाली आहे. 'एकदा अक्षत पडली की पोरीला दोन क्षण सुद्धा मोकळे मिळणार नाहीत. आणि मग सासरी जाईल, भुर्रकन परदेशातही निघून जाईल नवऱ्याबरोबर .. मग कशी आपल्याला भेटणार? ' नातीशी चार शब्द बोलायची, तिला प्रेमानी जवळ घेऊन तोंडभर आशीर्वाद द्यायची आज्जींना तीव्र इच्छा होते. त्या खुर्च्यान्मधून वाट काढत काढत हॉल मधल्या वधु-पक्षाच्या खोली कडे निघतात. ' नातीची तयारी चालू असेल आत. साडी नेसायची सवय नाही.. आज दिवसभर तो जड शालू कसा सांभाळणार ? ' असा विचार करत त्या आत जाणार तेवढ्यात एक बाई खोलीचं दार बंद करत म्हणते, ' नवरीचा मेक-अप चालू आहे ... आता प्लीज तिला कोणी डिस्टर्ब करू नका." दार धाडकन बंद होतं आणि आज्जींच्या मनात एक आठवणीची खिडकी उघडते ... त्यांच्या स्वतःच्या लग्नाची आठवण!

साल: १९४८
वेळ: साधारण हीच
स्थळ: खुन्या मुरलीधर मंदिर, पुणे 

मंदिराच्या प्रशस्त आवारात लग्नाची तयारी चालू आहे. मोजक्याच आप्त आणि मित्र मंडळीनी आवर फुलले आहे. लग्नाचे जेवण म्हणून अवघ्या २५ पानांचा स्वयंपाक पाठीमागे चालू आहे. २१ वर्षांचा नवरा-मुलगा. खादीचा शुभ्र पायजमा आणि खादी सिल्कचा शर्ट अंगात. मुलाच्या घराची अशी ५-६ च माणसे. १७ वर्षांची नवरी मुलगी. पुण्यात नातेवाईकांकडे राहणारी. वडील नाहीत आणि आई, भावंडे लांब नागपूरला. 'मुद्दाम कर्ज काढून लग्नाला येऊ नकोस. नंतर पाया पडायला आम्हीच येऊ' असे मुलीने आईला कळविले असल्यामुळे मुलीकडचे पुण्यातले नातेवाईक तेवढे लग्नाला हजर. अशी परिस्थिती  असताना जमेल तेवढाच माफक शृंगार मुलीनी केला आहे... नवी साडी, गजरे, हातात हिरव्या बांगड्या आणि मुंडावळ्या. पण या तरुण वयातही असलेला समजुतदारपणा, विचारी स्वभाव, आत्मविश्वास आणि पुढच्या आयुष्याविषयीची स्वाभाविक उत्सुकता या सगळ्याच्या मिश्रणातून एक वेगळेच तेज चेहऱ्यावर झळकते आहे. 
मागच्या वर्षीच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. मुलाच्या व त्याच्या घरच्यांच्या स्वातंत्र्य-चळवळीतील सहभागाचा आणि सुधारक, पुरोगामी विचारांचा प्रभाव समारंभावर पडलेला जाणवतो आहे. मानापानाची, देवाण-घेवाणीची प्रथाही इथे न पाळल्यामुळे समारंभाला वाद-विवादाची झालरही नाही. अगदी जवळच्या लोकांसमवेत दोघांनी एकत्र जीवन फुलविण्याची सुरुवात करण्याचा साधा-सोपा सोहळा. कुठलाही आवेश, दिखावा नाही. तशी मानसिकताही नाही.
मंदिराचे भटजी आता पुकारा करीत आहेत... सांगत आहेत की 'सगळी तयारी झाली, मुहूर्त घटिका आली. अंतरपाट कोण धरेल?' त्याच बरोबर बाहेर श्रावण सरींनीही हजेरी लावली आहे. मोजके ५ विधी, हारांची देवाण-घेवाण आणि नवऱ्या-मुलाने वधूच्या गळ्यात काळ्या मण्यांची पोत घालताच सुमंगल लग्न - सोहळा पार पडलेला आहे. येणाऱ्या सुख, दुःख, कष्ट, आनंद सगळ्यासामावेत पुढच्या आयुष्यभरासाठी एकमेकांची साथ लाभल्याचा अपार, निर्भेळ आनंद दोघांच्याही चेहऱ्यावरून ओसंडतो आहे. 

"आज्जी.. आज्जी अगं आत ये ना... " हाक ऐकून आज्जी भानावर येतात. नात दार उघडून बाहेर येते आणि आज्जींना हाताला धरून आत घेऊन जाते. 'अगं तयारी एकीकडे होत राहील. अजून थोडा वेळ आहे. मला तुझ्याशी पुन्हा इतक्यात असं बोलायला कधी मिळणार? मला माहितीये तू माझी काळजी करत असणार... पण नको करूस. परदेशात गेल्यावरही मला माझं काम, घर सगळं येईल सांभाळता आणि आम्ही दोघं मिळून करू गं व्यवस्थित मॅनेज. शेवटी मी तुझीच नात आहे :) आता तू आणि आजोबा मात्र तब्येतीची काळजी घ्या. माझं तिकडे सगळं सेट झालं की मी तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे काही दिवस. माझा संसार बघायला येशील ना? " नातीचे डोळे उत्साहानी चमकतात. चेहेऱ्यावर मेक-अप चा लेप असला तरी डोळ्यातले भाव तसेच असतात. समजुतदारपणा, आत्म-विश्वास, आनंद, उत्साह तोच. आज्जींच्या मनात येते की तीन पिढ्यांच्या काळात परिस्थिती किती बदलली.. सुबत्ता आली. सगळ्या हौसा-मौज पुरवता येण्या इतकी संपन्नता आली. भपका आला... दिखावा आला... पण जेंव्हा नवरा-नवरीच्या चेहऱ्यावर असाच निर्भेळ, अपार आनंद झळकतो... त्यांनी एकमेकांना प्रेमानी, विश्वासानी स्वीकारल्याचं जाणवतं तेंव्हाच खरं सगळं सुमंगल होतं. बाकी इतर कशाला काही महत्त्वं नाही. 
नातीच्या डोक्यावर त्या हात फिरवून 'सुखी रहा' म्हणतात आणि सोहळा जणू आत्ताच पार पडल्याच्या आनंदात बाहेर येऊन आजोबांच्या शेजारी बसतात.

- जुई  

Monday, March 28, 2011

चंद्र अवचित...

तशी मीही अजून जागीच आहे...
पण निजेला परतवते आहे ... कारण तू ही जागा आहेस.

चल,
वाऱ्यावर तरंगत आलेल्या या मोहक क्षणाचा हात धर...
आणि मांजर-पावलांनी अलगद ये माझ्या बरोबर...
तशी आपल्या सुखाची फुलं उमलली आहेतच ...
पण हवेत सुगंध भरलाय... तो बहुदा चांदण्यांचा.

ऐक,
सगळीकडची निरव शांतता... 
निश्वासांचे हुंकार सुद्धा विरघळून गेल्यासारखी ... 
तशी मी तुझ्या कानात गुज सांगते आहे...
पण कुठूनशी कुजबुज ऐकू येतीये ... ती रातराणीची 

बघ, 
सगळं शहर झोपेच्या धुक्यात बुडलंय.
त्याच्या वर-खाली होणाऱ्या श्वासांच्या लाटेवर झुलताना वाराही मंद झालाय...
तसा थोडा गारवा आहे हवेत...
पण शहारा आलाय... तो तुझ्या स्पर्शामुळे...

थांब,
बोलू नकोस काही ... आणि हलू नको जरासुद्धा..
हा क्षण संपण्याआधी साठवून घे मला तुझ्यात..
तशी पौर्णिमाच आहे आज...
पण चंद्र अवचित ग्रासलाय ... तो तुझ्या माझ्या एकांतासाठी...

___जुई


Monday, March 21, 2011

तुकडे

खिडकीवर सारलेल्या गडद पडद्याच्या फटीतून  
एक कोवळी तिरीप पाझरली 
आणि तुझ्याशी ओळख झाली 
त्या सोनेरी तुकड्यामुळे  ...

नंतर मग ...
वेगवेगळ्या झरोक्यातून, खिडक्यांतून, दारातून
आत आलेले ते पिवळे, निळे, राखाडी, सप्तरंगी तुकडे 
माझ्याशी लपा-छपी खेळत राहिले...
भिंगातून संकोचलेले...
गजांमध्ये दुभागलेले...
डबक्यामध्ये विरघळलेले ...
चष्म्याच्या आड काळवंडलेले ...
फाटक्या छपरातून सांडलेले...
असंख्य तुकडे.

अश्या तुकड्या-तुकड्यांमधून हुलकावणी देणारा तू 
आणि ते झेलताना भान हरपलेली ध्यासवेडी मी...
कधी त्यातून तुझं चित्र  साकारतंय का बघणारी,
कधी त्यात तुझं प्रतिबिंब उमटतंय का याची वाट पाहणारी,
कधी त्यातून तुझी मूर्ती घडतीये का शोधणारी...

जसजसे तू उधळत असलेल्या तुकड्यांचे रंग होऊ लागले गडद ...
आणि कंगोरे अधिक बोचरे,
तसतशी मी शहाणी होत गेले...
कितीही सांधले तरी तुझं आदिम, अनंत रूप त्या तुकड्यात थोडंच भेटणार होतं मला...
ते झेलण्यासाठी त्यांच्या मागे धावताना मला माझी वाट मात्र सापडली.
मग तुझी निशाणी म्हणून त्यातला एक पारदर्शी तुकडा डोळ्यात बसवून घेतला, 
आणि बाकीचे सोडून दिले ओंजळीतून खाली...

पुढे जाताना फक्त एकदा मागे वळून पाहिलं तेंव्हा दिसला...
एक सोनेरी तुकडा,
कुठल्याश्या गडद पडद्याच्या फटीतून 
आत झिरपताना...

___ जुई

Tuesday, February 22, 2011

प्रचीती



जेंव्हा पांघरली जराशी, कृष्ण मेघांची दुलई...
गेली चटका देऊन, तप्त विजेची सळई

जेंव्हा टांगला जरासा, इंद्रधनुला हिंदोळा...
सूर्य अस्ताला कलला, धनुष्य मोडून गेला.

जेंव्हा माळले जरासे, शुभ्र गारांचे मोती...
आले ऊन कवडसे, माळ चोरून ते नेती.

जेंव्हा गुंफल्या जराश्या, चंचलश्या जलधारा...
गेला उनाड भरारा, गोफ उसवून वारा.

जेंव्हा झंकारली जरा, मनी मृदगंधाची धून...
कोसळत्या निनादात, गेली विरून.. वाहून...

पण, जेंव्हा खोचला जरासा, भाळी मोराचा पिसारा...
लाजली सृष्टी सारी, रंग उरला निळा... गहिरा...

___ जुई

Tuesday, November 23, 2010

समारोप


समारोप
रोज पहाटे ठरलेली देवळाभोवती एक फेरी....
भक्ती आणि प्रार्थना जुनीच ... ना इच्छाही नवी कोरी.

झिजलेल्या काठीच्या मुठीवर सुरकुतलेला घट्ट हात...
वर्षानुवर्षे त्यांची एकमेकींना निष्ठावंत साथ.

कुरकुरणाऱ्या वहाणेचा फडफडणारा तुटका बंद...
पारिजातका शेजारून जाताना आपोआप होणारी चाल मंद ...

परतताना कोवळ्या उन्हाची उबदार माया पाठीवरती ..
आणि डोळ्यांमधली ओळखीची स्मित-हास्ये अवती भवती...

घराभोवती पसरलेल्या अस्तित्वाच्या खाणा-खुणा ..
रंग-स्पर्श-गंध आणि बंध सुद्धा मऊ, जुना....

कोपऱ्यातल्या कुंडीतली नाजुकशी तुळशी बाई ...
कठड्यावरचे दाणे खाऊन उडून जायची चिमणीची घाई....

भिंतीवरचं चौकटी मधलं कृष्ण धवल छायाचित्र ...
पिवळसर दुमडल्या काठांची जुनी पुराणी काही पत्रं ...

ठसक्यासाठी कपाटावरती खडीसाखरेची एक पुडी...
कपाटामध्ये जीवे जपलेली एक हिरवी रेशीम-घडी.

तिन्ही सांजेला दरवळणारा उदबत्तीचा मंद वास..
दुपारच्यातलेच काढून ठेवलेले रात्रीसाठी चे दोन घास.

थरथरणारी ज्योत मग राती, एकच मागणे मागत राही....
एकांताच्या सोहळ्याची निजेमधेच सांगता व्हावी...

जुई